​अहिल्यानगर : मध्यपूर्व व आखाती प्रदेशात निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर तेथे अडकलेल्या जिल्ह्यातील नागरीकांशी संपर्क साधण्यात आला असून, भारत सरकारचे परराष्ट्र मंत्रालय व महाराष्ट्र शासनाने परदेशात अडकलेल्या भारतीयांच्या सुरक्षिततेसाठी पावले उचलली आहेत. त्या भागात अडकलेल्या अहिल्यानगर जिल्ह्यातील नागरिकांच्या मदतीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात ‘जिल्हा नियंत्रण कक्ष’ स्थापन करण्यात आल्याची माहिती जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.

दरम्यान समाजमाध्यमावर आखाती देशात अडकलेल्या जिल्ह्यातील नागरिकांच्या चित्रफिती प्रसारित होत असल्या तरी प्रत्यक्षात जिल्हाधिकारी कार्यालयाशी अवघ्या एकाच व्यक्तीने संपर्क साधला आहे. केदार केकाण असे या तरुणाचे नाव असून तो कोपरगाव तालुक्यातील जेऊर पाटोदा येथील रहिवासी आहे. तो अबुधाबी येथील विमानतळावर अडकून पडल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली.

परदेशात अडकलेल्या नागरीकांच्या नातेवाईकांनी नियंत्रण कक्षात संपर्क साधावा, उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना सर्वतोपरी मदत करण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती मंत्री विखे यांनी दिली.

​परदेशात अडकलेल्या नागरिकांच्या सुरक्षिततेवर महाराष्ट्र शासन व परराष्ट्र मंत्रालयाचे बारकाईने लक्ष असून, त्यांच्या संरक्षणासाठी व आवश्यकतेनुसार त्यांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी प्रशासनाचे सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. राज्य सरकारने केंद्र सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या सूचनेनूसार २४ तास हेल्पलाईन क्रमांक देण्यात आले असून संपर्कासाठी ०२२-२२०२७९९० असा क्रमांक देण्यात आला आहे.

अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यान्वित करण्यात आलेल्या नियंत्रण कक्षातील ०२४१-२३२३८४४. व २३५६९४० क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन मंत्री विखे पाटील यांनी केले आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील जे नागरिक या युद्धजन्य परिस्थितीत अडकले आहेत, त्यांना विमानसेवा बंद असल्याने थांबण्याची वेळ आली आहे. या सर्वाशी जिल्हाधिकारी कार्यालयाने संपर्क करत असून काही नागरीकांशी व्यक्तिगत आपणही संपर्क करून दिलासा दिल्याचे त्यांनी सांगितले. माहिती देण्यासाठी व मदतीसाठी जिल्हा नियंत्रण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालयात संपर्क साधण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

​​विविध देशांतील भारतीय दूतावासांचे २४x ७ आपत्कालीन क्रमांक उपलब्ध तात्काळ मदतीसाठी इस्रायल (तेल अवीव), इराण (तेहरान), पॅलेस्टाईन (रामल्लाह), कतार (दोहा), सौदी अरेबिया (रियाध), संयुक्त अरब अमिरात (अबू धाबी), कुवैत, बहरीन, मस्कत, जॉर्डन आणि इराक (बगदाद) येथील भारतीय दूतावासांनी विशेष आपत्कालीन हेल्पलाइन क्रमांक, व्हॉट्सॲप क्रमांक आणि ईमेल आयडी जाहीर केले आहेत. नागरिकांनी गरजेनुसार या क्रमांकांवर संपर्क साधावा असे आवाहन मंत्री विखे यांनी केले आहे.