अहमदनगर जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागात आग लागून झालेल्या दुर्घटनेसंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शोकसंवेदना व्यक्त केली असून याप्रकरणी सखोल चौकशी करून हलगर्जीपणास जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. तसंच आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी ५ लाखांची मदत जाहीर केली आहे.

याबद्दल राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं, या दुर्घटनेमध्ये मृत्यूमुखी पडलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. या घटनेची तात्काळ चौकशी करुन आठवडाभराच्या आत अहवाल सादर करण्याचे आदेश स्थानिक प्रशासनाला देण्यात आले आहेत.

आगीची घटना कळताच मुख्यमंत्र्यांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याशी तसेच मुख्य सचिव यांच्याशी बोलून तातडीने सध्या उपाचारधिन रूग्णांना उपचार मिळण्यात काही अडचणी येणार नाही ते पाहण्यास सांगितले असून जिल्हाधिकाऱ्यांनी या दुर्घटनेची सखोल चौकशी करून अहवाल सादर करावा असे निर्देश दिले आहेत.

तर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. नगर जिल्हा रुग्णालयातील आगीची घटना दुर्दैवी असून सदर घटनेच्या उच्चस्तरीय सखोल चौकशीचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. चौकशीत दोषी आढळणाऱ्यावर कठोरात कठोर कारवाई करण्यात येईल तसेच अशा दुर्घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी आवश्यक प्रतिबंधक उपाययोजना राबवण्याचे निर्देश सर्व संबंधित विभागांना तात्काळ देण्यात येतील, असेही उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.