गेल्या महिन्याभरापासून राज्याचा रखडलेला मंत्रीमंडळ विस्तार आज सकाळी ११ वाजता राजभवनावर होणार आहे. या विस्ताराच्या पहिल्या टप्प्यात २० ते २२ मंत्री शपथ घेण्याची शक्यता आहे. दरम्यान, यावरून विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी खोचक टीका केली आहे. आमदार नाराज होऊ नये आणि अधिवेशन व्यवस्थित चालावं म्हणूनच तात्पुरता मंत्रीमंडळ विस्तार होत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

हेही वाचा – “पंतप्रधान मोदी म्हणाले महाराष्ट्राला…”; हिंगोलीच्या सभेत मुख्यमंत्री शिंदेंचं नीति आयोगाची बैठक, हजारो कोटींचा उल्लेख करत विधान

नेमकं काय म्हणाले अजित पवार?

“आज सकाळी ११ वाजता मंत्रीमंडळ विस्तार आहे. यासंदर्भात मला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोन आला होता. त्यामुळे विरोधी पक्षनेता म्हणून मी हजर राहणार आहे”, अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दिली आहे.

हेही वाचा – मंत्रिमंडळाचा आज विस्तार ; पहिल्या टप्प्यात भाजप-शिंदे गटातील २० ते २२ जणांना संधी

पुढे बोलताना त्यांनी आमदाराच्या नाराजीवरही भाष्य केलं आहे. “कुणांचंही सरकार आलं तरी आमदार नाराज होतात. मंत्रीमंडळाचा विस्तार होतो, तेव्हा अनेकांना वाटतं की आपल्या मंत्रीपद मिळावं, ज्यांना संधी मिळत नाही. ते नाराज होतात. आज होणारा मंत्रीमंडळ विस्तार हा पूर्ण नाही, अशी माहिती आहे. माध्यामांतदेखील तशाप्रकारच्या बातम्या आहेत. कदाचित आमदारांची नाराजी दूर व्हावी आणि अधिवेशन व्यवस्थित चालावं, यासाठी मंत्रिमंडळाचा पूर्ण विस्तार होत नसावा, असा माझा अंदाज आहे”, असेही ते म्हणाले.