पदं घेतली आणि काही दिवसांना दुसऱ्या पक्षात तडफडली… अशा शब्दांत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांना गयारामांना टोला लगावला. ते मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यकर्ता मार्गदर्शन शिबिरात बोलत होते.

ते म्हणाले, “आपण पक्षाची स्थापना केली त्यावेळेस सुरूवातीला रा.ता. कदम पक्षाचे मुंबईचे अध्यक्ष होते. त्यानंतरच्या काळात चंद्रकांत त्रिपाठी अध्यक्ष झाले. त्यानंतर अनेक वेळा सचिन अहीर अध्यक्ष झाले. संजय पाटील, नरेंद्र वर्माही अध्यक्ष होते. आता नवाब मलिक मुंबई अध्यक्ष आहेत. यापैकी नवाब मलिक, नरेंद्र वर्मा यांना सोडलं तर इतर चौघही आपल्यापासून निघून गेली. त्यांचा काही उपयोग नाही. त्यामुळे पदं देत असताना विचार करा. यापूर्वी सचिन अहीर, चित्रा वाघ, संजय पाटील, प्रसाद लाड, सुभाष मयेकर या सगळ्यांना पदं मिळाली. पण, एक मायचा लाल इथं थांबला नाही. सगळी तिकडं तडफडली. अशी माणसं कशाला शोधताय? माणसं अशी शोधा की जो सरकार असो वा नसो पवारसाहेबांच्या विचारांपासून यत्किंचितही ढळणार नाही.”

कार्यकर्ता मार्गदर्शन शिबिराचे उद्घाटन राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर त्यांचे जोरदार भाषणही झाले. त्यात त्यांनी स्पष्ट केलं की, “समाजाचं भलं करण्यासाठी पदाचा उपयोग करा. पवारसाहेबांना व मला मान खाली घालावी लागेल असे वागू नका असे सांगतानाच आता हौसे नवशे गवशे येतील मात्र त्यांना पदांपासून दुर ठेवा. दोन वर्ष त्यांना काम करु द्या असा आदेश अजितदादा पवार यांनी दिला. पदे मिळाली ते पक्ष सोडून गेले त्यामध्ये सचिन अहिर, संजय पाटील, चित्रा वाघ, प्रसाद लाड असे सगळे निघून गेले आहेत. मात्र असे कार्यकर्ते शोधा जे सत्ता नसताना आपल्याकडे राहतील. जे कोण चिकटायला आले आहेत. त्यांना दोन वर्ष काही देवू नका. त्याला काम करु द्या.”