Ajit Pawar on Mahavikas Aghadi MLA’s Oath as a Maharashtra Legislative assembly Member : महायुती सरकारचा शपथविधी सोहळा दोन दिवसांपूर्वी संपन्न झाला असून तीन मंत्र्यांचं सरकार कामाला लागलं आहे. पाठोपाठ या सरकारने विधानसभेचं विशेष अधिवेशन बोलावलं आहे. आज (७ डिसेंबर) विधान भवनात नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी पार पडला. मात्र, महाविकास आघाडीमधील एकाही आमदाराने आज विधानसभा सदस्यत्वाची शपथ घेतली नाही. महायुतीने ईव्हीएममध्ये घोळ करून हा विजय मिळवला असल्याचा दावा करत विरोधकांनी शपथविधीवर बहिष्कार टाकला. तसेच महायुतीच्या विजयाचा निषेध नोंदवला. दरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधकांच्या या आंदोलनावरून त्यांच्यावर टीका केली आहे. तसेच “विधानसभेतील आमचा विजय हा ईव्हीएमचा विजय असं विरोधकांचं म्हणणं म्हणजे त्यांचा रडीचा डाव आहे”, असंही अजित पवार म्हणाले.
“आमच्या महायुतीला एवढ निर्विवाद आणि प्रचंड बहुमत मिळालं आहे. मात्र, विरोधक त्यांचा पराभव स्वीकारण्याऐवजी ईव्हीएमचा मुद्दा काढून रडीचा डाव खेळण्याचा प्रयत्न करत आहेत. मी देखील यापूर्वी महाविकास आघाडीत काम केलं आहे. मी महाविकास आघाडीचा एकेकाळचा कार्यकर्ता आहे. परंतु, मला हे ईव्हीएमला दोष देणं वगैरे पटत नाही. याला काही अर्थ नाही”, अशा शब्दांत अजित पवारांनी विरोधकांच्या आंदोलनावर टीका केली.
अजित पवार नेमकं काय म्हणाले?
उपमुख्यमंत्री म्हणाले, “लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या ३१ जागा निवडून आल्या. तेव्हा यांच्यासाठी ईव्हीएम चांगलं होतं. परंतु, विधानसभा निवडणुकीत यांचा पराभव झाला तर हे ईव्हीएमला दोष देऊ लागले आहेत. लोकशाहीत कधी आघाडीला तर कधी युतीला यश मिळत असतं. त्यानंतर पक्षांना व त्यांच्या नेत्यांना हवं ते वक्तव्य करण्याचा अधिकार आहे. मात्र, त्यांच्या निवडून आलेल्या आमदारांना उद्या संध्याकाळपर्यंत शपथ घ्यावी लागेल. शपथ घेण्याचा उद्याचा शेवटचा दिवस आहे. उद्या संध्याकाळपर्यंत त्यांना शपथ ही घ्यावीच लागेल. तरच त्यांना परवा (९ डिसेंबर) विधानसभेच्या अधिवेशनासाठी सभागृहाच्या कामकाजात सहभागी होता येईल. ही विधिमंडळाची प्रक्रिया आहे. ती आपल्याला मोडता येणार नाही”.
हे ही वाचा >> Chhagan Bhujbal : विरोधी पक्षांच्या आमदारांनी जर उद्या शपथ घेतली नाही तर काय होणार? भुजबळ म्हणाले…
अजित पवार म्हणाले, “अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी आपण काहीतरी वेगळं करतोय हे दाखवण्याचा मविआ नेत्यांचा प्रयत्न आहे. आम्ही संख्येने जरी कमी असलो तरी आमचं अस्तित्व दाखवण्याचा आम्ही प्रयत्न करणार, अशी त्यांची भूमिका आहे. स्वतःचं अस्तित्व दाखवण्यासाठी त्यांचा हा केविलपणा प्रकार चालू आहे. याला काही अर्थ नाही. खरंतर आज शपथविधीच्या सुरुवातीला ते सर्वजण सभागृहातच बसले होते. आमच्या ८ ते १० लोकांनी शपथ घेतल्यानंतर विरोधक खाली उतरू लागले. मी तेव्हा त्यांना विचारलं, कुठे निघाला आहात? तर ते म्हणाले, आम्ही असेच निघालो आहोत. आता मी त्यांना पुन्हा विचारलं, तर ते मला म्हणाले, आज कोणत्याही परिस्थितीत आपण शपथ घ्यायची नाही असं आमचं धोरण ठरलं आहे”.