राज्यात गेल्या काही दिवसांपासून अनेक भागांमध्ये मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे. काही ठिकाणी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने एनडीआरएफच्या नियमांच्याही दुप्पट मदत जाहीर केल्याचा दावा केला आहे. मात्र, ही मदत तुटपुंजी असल्याची टीका विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज विधानसभेत बोलताना केली. विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू असून त्यात अतिवृष्टी आणि मदतनिधीच्या मुद्द्यावरून अजित पवारांनी राज्य सरकारला धारेवर धरलं. तसेच, यावेळी सत्ताधारी पक्षातील काही आमदार-मंत्र्यांवर अजित पवार चांगलेच भडकले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अजित पवारांचा सत्ताधाऱ्यांना परखड सवाल

“राज्यात एवढी गंभीर परिस्थिती निर्माण झाली की अनेक भागातल्या जमिनी पावसामुळे खरवडून गेल्या आहेत. तिथे एनडीआरएफचे नियम काहीही मदत करू शकत नाहीत. या जमिनींवर २-४ वर्ष तरी काही पिकणार नाही. काही ठिकाणी दुसऱ्याच्या जमिनीतला गाळ वाहून तिसऱ्याच्या जमिनीत गेला. सगळी पिकं अडचणीत आहेत. हे असताना तुम्ही घोषणा केली की एनडीआरएफच्या दुप्पट मदत जाहीर केली. पण ती मदत तुटपुंजी आहे. शेतकऱ्याचा सगळा खर्च प्रत्येक एकराला ११ ते साडेअकरा हजार खर्च येतो. पण तुम्ही हेक्टरी फक्त १३ हजार ६०० रुपये मदत जाहीर केली आहे. त्या शेतकऱ्यानं काय करावं?” असा सवाल अजित पवारांनी आपल्या भाषणात केला आहे.

“मुख्यमंत्री महोदय, तुम्ही आदेश काढायला हवा होता की…”

दरम्यान, राज्यात अतिवृष्टीची परिस्थिती असताना आणि शेतकरी संकटात सापडलेला असताना सत्ताधारी पक्षातले काही लोक राज्यात हार-तुरे आणि सत्कार स्वीकारत होते, असं अजित पवार यावेळी म्हणाले. “एक बाब फार लाजिरवाणी घडली. महाराष्ट्रात अतिवृष्टी, पीकनुकसान हे सगळं घडत असताना दौऱ्यांवर तुमचे काही मंत्री जात असताना क्रेनने मोठमोठे हार घालण्याचं काम होत होतं. तिथे माणसं मरत आहेत, शेतकरी आत्महत्या करत आहेत आणि आपण काय करतोय? त्याबाबत तुम्ही आदेश काढायला हवा होता की सध्याची राज्याची परिस्थिती बिकट आहे. कुणीही असे सत्कार स्वीकारू नका. थोडं शांतपणे घ्या. असं वागू नका”, असं अजित पवार म्हणाले.

“मुख्यमंत्री महोदय..हे वागणं बरं नव्हं, आपल्याला पुन्हा एकत्र…”; विधानसभेत अजित पवारांची टोलेबाजी!

“मुख्यमंत्री महोदय, तुमचे काही लोक सत्कार स्वीकारत आहेत. एवढे मोठे हार क्रेनला घालून स्वीकरण्याचा प्रयत्न करत आहेत. फोटोसेशन होत आहे. हे बरोबर नाही. कारण अजूनही पाऊस आहे, शेतकरी अडचणीत आहे. ४५ दिवसांत १३७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. काय त्या विधवा पत्नींनी करायचं? का त्यांना सरकारचा आधार वाटत नाही? शेतकऱ्याला मदत करा. त्याला असं वाटू द्या की हे सरकार माझ्या पाठिशी आहे. आपण आत्महत्या करायला नको. त्यासाठी कर्ज काढा, पंतप्रधानांना भेटा, अर्थमंत्र्यांना भेटा, ज्यांना कुणाला भेटायचं असेल त्यांना भेटा. पण राज्यातल्या शेतकऱ्याला अडचणीतून बाहेर काढण्यासाठी तातडीने उपाययोजना करा”, असंदेखील अजित पवार म्हणाले.

“तुम्ही तुमच्या घरी मंत्री असाल” नीलम गोऱ्हेंनी गुलाबराव पाटलांना विधान परिषदेत खडसावलं, म्हणाल्या…

शंभूराज देसाईंवर भडकले अजित पवार

दरम्यान, शेतकऱ्याला मानसिक आधार देण्यासाठी काही निर्णय घ्यावे लागतात, असं सांगताना अजित पवारांनी २००३ मध्ये केलेल्या कृत्रिम पावसाच्या प्रयोगाचं उदाहरण दिलं. मात्र, यावेळी अचानक मध्येच “आता भरपूर पाऊस झालाय” असं शंभूराज देसाई यांनी म्हणताच अजित पवार त्यांच्यावर चांगलेच संतापले. “शंभूराजे, आपण एकत्र काम केलं आहे. बोलत असताना मधे बोलायचं नसतं. पाऊस चांगला झाला म्हणताय. कोरडा दुष्काळ नाही, ओला दुष्काळ पडलाय. काय सांगताय पाऊस चांगला झाला? ओला दुष्काळच आहे ना? मी उदाहरण देत होतो. तुमच्याच मतदारसंघात पवनचक्क्या उभ्या केल्या. काहींनी सांगितलं की याची पाती मोठी आहेत म्हणून ढग अडले आहेत. काहीजण त्या तोडायलाही निघाले होते. लोकांना समजून घ्यायचं असतं. म्हणून मी म्हटलं दुष्काळाच्या काळात कृत्रिम पाऊस पाडायचा प्रयत्न झाला”, अशा शब्दांत अजित पवारांनी आपला संताप व्यक्त केला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ajit pawar slams cm eknath shinde ruling party ministers in monsoon session pmw
First published on: 18-08-2022 at 16:02 IST