खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा या दाम्पत्याकडून काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानाबाहेर हनुमान चालीसा पठण करण्याचा इशारा देण्यात आला होता. पोलिसांनी कारवाई करत राणा दाम्पत्याला अटक केल्यामुळे हे आंदोलन यशस्वी होऊ शकलं नाही. मात्र, राणा दाम्पत्याला झालेली अटक आणि त्यानंतर राज्याच्या राजकारणात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये झालेलं आरोप-प्रत्यारोपांचं राजकारण, यामुळे हा मुद्दा चांगलाच चर्चेत आला होता. या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पिंपरी-चिंचवडमध्ये आयोजित राष्ट्रवादीच्या मेळाव्यात बोलताना राणा दाम्पत्याला टोला लगावला. तसेच, सिल्व्हर ओकवर झालेल्या एसटी कर्मचारी आंदोलनावरून देखील त्यांनी निशाणा साधला. "यामागे कुणाचं डोकं आहे?" शरद पवारांच्या मुंबईतील निवासस्थानावर एसटी कर्मचाऱ्यांनी काढलेल्या मोर्चाच्या मागे कुणाचं डोकं आहे, असा सवाल अजित पवारांनी यावेळी केला. "सध्या राज्यात काही व्यक्ती जाणीवपूर्वक संस्था, संघटनांकडून समाजात जातीच्या, धर्माच्या नावाचं विष पेरण्याचं काम करत आहेत. शरद पवार यांच्या घरावर हल्ला झाला. त्याचं काही कारण नव्हतं. शरद पवार हे त्यांच्या कामात असतात. ते भले, त्यांचं काम भलं. तरी त्यांच्या घरावर हल्ला करण्याचा प्रयत्न काही लोकांनी केला. यामागे कोणाच डोकं आहे? कोण शक्ती आहे?", असा सवाल त्यांनी केला. "राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्याला भाजपाच्या पुरुष कार्यकर्त्याने मारहाण केली. अशा गोष्टी समाजाला आवडत नाहीत. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी कायदा हातात घेऊ नये. याचे परिणाम संबंधितांना भोगावे लागतात. हे नागरिक लक्षात ठेवतात आणि शिक्षा देतात. तुम्ही अहिंसेच्या मार्गाने आंदोलन करू शकता", असं देखील अजित पवार यावेळी म्हणाले. “मारूतीराया देखील म्हणत असतील, माझा जन्म…”, अजित पवारांची पिंपरी-चिंचवडमधील मेळाव्यात चौफेर फटकेबाजी! "दुसऱ्याला त्रास देण्याचा अधिकार तुम्हाला नाही" "मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानाबाहेर हनुमान चालीसा वाचण्याचा प्रयत्न केला गेला. हे कशाकरता? जे करायचं आहे ते तुमच्या घरी करा. तुम्हाला कोणी अडवलं आहे? दुसऱ्याला त्रास देण्याचा अधिकार तुम्हाला संविधानाने दिलेला नाही. तुम्ही तुमच्या धर्माचा, जातीचा, पंथाचा आदर करा. पण त्यातून दुसऱ्याला त्रास होता कामा नये", असं अजित पवार म्हणाले. यावेळी बोलताना अजित पवारांनी हनुमान जन्मभूमीवरून सध्या सुरू असलेल्या वादावरून देखील टोलेबाजी केली. "(सध्याच्या वादानंतर) मारुती राया देखील म्हणत असतील माझा जन्म कुठं झाला ते मला माहित आहे, तुम्ही का भांडताय? कोण म्हणतंय कर्नाटक, कोण म्हणतंय नाशिक, कोण म्हणतंय यूपीत…ठीक आहे, झाला असेल.. पण ते मारुती रायाच आहेत. कुठलंतरी वेगळं सांगून काही उपयोग आहे का? आपल्याला शनिवार धरून दर्शन घ्यायचंच आहे. यांच्यातून नागरिकांची दिशाभूल करण्याच काम सुरू आहे", असं अजित पवार म्हणाले. नाशिकच्या अंजनेरी येथील हनुमान जन्मस्थळाबाबत तोडगा काढण्यासाठी शास्रार्थ सभेचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, याठिकाणी दोन्ही बाजूच्या महंतांकडून बसण्याच्या जागेवरून चांगलीच खडाजंगी झालेली पहायला मिळाली. अक्षरश: दोन्ही बाजूचे महंत हमरीतुमरीवर उतल्याचे पहायला मिळाले. त्यामुळे सभेचा मूळ विषय बाजूलाच राहिला आणि काही वेळ मानअपमानाचा गोंधळ उडाला होता.