सरकारने दिलेली कर्जमाफी फसवी असल्याचा निषेध करत आता नाशिक जिल्ह्यातले शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत. नाशिक ते मुंबई असा हा विराट मोर्चा निघाला आहे. या मोर्चात ३० हजारांपेक्षा जास्त शेतकऱ्यांचा सहभाग आहे. हा मोर्चा सध्या ठाण्यात पोहचला असून या सोमवारी म्हणजेच १२ मार्चला हा मोर्चा विधान भवनावर धडकणार आहे.

 

किसान मोर्चा ठाण्यापर्यंत पोहचला- फोटो सौजन्य-दीपक जोशी

राज्य सरकारचे धोरण शेतकरी विरोधी आहे असा आरोप किसान सभेने केला आहे. नाशिकपासून लाँगमार्च काढत सुरु झालेला हा मोर्चा १२ तारखेला म्हणजेच सोमवारी  विधान भवनावर धडकणार आहे. ३० हजारांपेक्षा जास्त शेतकरी या मोर्चात सहभागी झाले आहेत. आस्मानी संकट आणि सरकारचे दुर्लक्ष यामुळे बळीराजा आर्थिक विवंचनेत सापडला आहे. सरकारकडून कोणतीही मदत मिळत नसल्याने शेतकऱ्यांवर आयुष्य संपवण्याचीही वेळ येते आहे. अशात जाहीर करण्यात आलेली कर्जमाफीही फसवी आहे. त्यामुळेच सरकारचा निषेध करण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला आहे.

मोर्चात ३० हजार पेक्षा जास्त शेतकरी सहभागी- फोटो सौजन्य-दीपक जोशी

शेतकरी कसत असलेल्या वनजमिनी शेतकऱ्यांच्या नावावर कराव्यात. शेतकऱ्यांना कोणत्याही अटी आणि शर्थींशिवाय कर्जमाफी द्यावी, शेतीमालाला दीडपट हमीभावापेक्षा कमी भाव देऊ नये, स्वामिनाथन आयोगाच्या रास्त भावाच्या शिफारसींची अंमलबजावणी तातडीने करावी या आणि अशा मागण्या करत किसान सभेने विराट मोर्चा काढला आहे.