विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आणि शिवसेनेचे आमदार अंबादास दानवे यांनी शिंदे फडणवीस सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. "शिंदे फडणवीस सरकार मारहाण करणाऱ्या, धमकी देणाऱ्या आमदारांना संरक्षण देत आहे," असा गंभीर आरोप अंबादास दानवे यांनी केला. यावेळी दानवेंनी आमदार सदा सरवणकर, प्रकाश सुर्वे, संतोष बांगर, संजय गायकवाड आणि खासदार नवणीत राणा यांचा उल्लेख केला. अंबादास दानवे म्हणाले, "या सरकारने चौकशीच्या नावाखाली सदा सरवणकरांना संरक्षण दिलं आहे. आमदार सुर्वे यांनी विरोधकांच्या तंगड्या तोडा आणि टेबल जामीन करतो, असं कार्यकर्त्यांना सांगितलं. जसं काय ते न्यायाधीश झाले आहेत." "जामिनावर असणाऱ्या राणेंनी अधिकाऱ्याला स्टेजमागे नेऊन मारहाण केली" "आमदार नितेश राणेंनी जामिनावर असताना एका अधिकाऱ्याला स्टेजच्या मागे नेऊन मारहाण केली. आमदार संतोष बांगरांनी मध्यान्न योजनेच्या अधिकाऱ्यांना मारहाण केली. आमदार संजय गायकवाडांनी तर 'गिन गिन के', 'चुन चुन के' मारू अशी धमकी दिली. परंतू सरकार याबाबत संरक्षण देत आहे," असं अंबादास दानवे यांनी सांगितलं. हेही वाचा : “रामदास कदमांचा मेंदू सडला आहे की…” उद्धव ठाकरेंबाबत केलेल्या आक्षेपार्ह विधानानंतर चंद्रकांत खैरेंचा संताप "कायदा-सुव्यवस्थेची बूज न राखणाऱ्यांना शिंदे-फडणवीस सरकारचं संरक्षण" "खासदार नवनीत राणा पोलीस स्टेशनमध्ये जाऊन बेमुर्वतपणे वागतात. त्यालाही सरकार संरक्षण देतं. एखाद्या सामान्य माणसाकडून गुन्हा घडला तर मी समजू शकतो. परंतु सत्ताधारी पक्षाचे लोकच कायदा आणि सुव्यवस्थेची बूज राखत नाही. त्याला आजचं शिंदे-फडणवीसांचं सरकार संरक्षण देतं. याबाबत आम्ही राज्यपालांकडे तक्रार केली आहे," असंही दानवेंनी नमूद केलं.