अलिबाग- सलग दोन दिवसांत दोन वेळा दरड कोसळल्यानंतर रायगडच्या जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी महाबळेश्वर आणि पोलादपूर यांना जोडणाऱ्या आंबेनळी घाटातील रस्त्याबाबत मोठा निर्णय घेतला आहे.

महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ, पोलादपूर तहसील प्रशासन आणि रायगड पोलिसांनी केलेल्या शिफारशीच्या आधारे हा निर्णय घेण्यात आला आहे. आंबेनळी घाट हा भूस्खलन, दरड कोसळणे आणि दगड घसरण्याच्या दृष्टीने अत्यंत धोकादायक असून, पावसाळ्यात येथे अतिमुसळधार पावसामुळे मोठा धोका निर्माण होत असल्याचे दिसून आले आहे. १ जुलै आणि २ जुलै दरम्यान या मार्गावर दोन वेळा दरडी कोसळल्या आहे. या परिसरात सुरु असलेल्या अतिवृष्टीमुळे घाट परिसर वाहतुकीसाठी धोकादायक बनला असल्याचे  संबंधित यंत्रणांनी दिलेल्या अहवालात नमूद केले आहे.

घाटातील तीव्र उतार, खोल दऱ्या, अस्थिर माती, हवामानामुळे विदीर्ण झालेले बेसॉल्ट खडक, दाट वनक्षेत्र आणि नैसर्गिक जलप्रवाह यामुळे पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात भूस्खलन, दरडी कोसळणे, वृक्ष उन्मळून पडणे, रस्ता खचणे आणि पाण्याचा वेगवान प्रवाह सुरू होण्याच्या घटना वारंवार घडतात. दाट धुके व कमी दृश्यमानतेमुळे अपघाताचा धोकाही वाढतो. सध्या घाटात संरक्षण भिंती, क्रॅश बॅरिअर्स, जलनिस्सारण व्यवस्था आदी सुरक्षाविषयक कामे सुरू असल्याने प्रतिकूल हवामानात वाहतूक सुरू ठेवणे धोकादायक ठरू शकते, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

 जिल्हाधिकारी यांचे आदेश काय

ही बाब लक्षात घेऊन रायगडच जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी महत्वाची वाहतूक अधिसूचना जारी केली आहे. त्यानुसार ३ ते ६ जुलैदरम्यान आंबेनळी घाट सर्व प्रकारच्या वाहनांसाठी पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय घएण्यात आला आहे. तसेच यापुढे रायगड जिल्ह्यासाठी भारतीय हवामान विभागाकडून ऑरेंज किंवा रेड अलर्ट जारी झाल्यास घाटातील हलक्या वाहनांची वाहतूकही पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. या शिवाय पावसाळ्यात रात्रीच्या वेळेतही या मार्गावरील सर्व प्रकारच्या वाहनांच्या वाहतुकीवर निर्बंध लागू राहतील. प्रशासनाने वाहनचालकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन केले आहे.

पर्यायी मार्गांचा अवलंब करण्याच्या सूचना… 

आंबेनळी घाटातील निर्बंध लक्षात घेऊन प्रवाश्यांनी पुणे–सातारा मार्गासाठी माणगाव–ताम्हाणी मार्ग, तर सातारा–कोल्हापूरकडे जाणाऱ्या वाहनांसाठी पोलादपूर–चिपळूण–पाटण–सातारा–कोल्हापूर हा पर्यायी मार्ग वापरण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

जिल्हा प्रशासनाने नागरिकांनी आदेशाचे पालन करून अनावश्यक प्रवास टाळावा व स्वतःच्या सुरक्षिततेला प्राधान्य द्यावे, असे आवाहन केले आहे.