राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या भेटीबाबत ट्विट केले आहे. दिल्लीत सुरु असलेल्या पावसाळी अधिवेषणादरम्यान ही भेट झाल्याचे बोलल्या जात आहे. शिवसेना सोडल्यानंतर पहिल्यांदाच अमोल कोल्हे आणि संजय राऊत एकत्र पहायला मिळाले. दरम्यान, संजय राऊत यांची भेट पर्वणी असल्याचे अमोल कोल्हे यांनी म्हटले आहे.

अमोल कोल्हे यांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. राष्ट्रवादी कडून अमोल कोल्हे यांना लोकसभा निवडणुकीसाठी शिरुर मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली होती. निवडणुकीत त्यांनी शिवसेनेचे आढळराव पाटील यांचा पराभव करत निवडणूक जिंकली होती.

संजय राऊत यांच्या भेटीबाबत कोल्हे म्हणाले, “शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची भेट झाली.त्यांची भेट ही नेहमीच पर्वणी असते.महाविकास आघाडी, मतदारसंघातील प्रकल्प अशा अनेक विषयांवर त्यांच्याशी चर्चा करता आली. मतदारसंघात ‘महाविकास आघाडी’ म्हणून काम करताना राऊत साहेबांनी केलेल्या मार्गदर्शनाचा नक्कीच लाभ होइल.”

शरद पवारांचा आशीर्वाद आहे म्हणून उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदावर -अमोल कोल्हे

यापुर्वी खासदार अमोल कोल्हे यांनी स्थानिक पातळीवर होणाऱ्या राजकारणावरून शिवसेनेवर टीकास्त्र सोडलं होतं. शिरूर लोकसभा मतदार संघातील पुणे ते नाशिक राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६० वरील नारायण गाव बाह्यवळण रस्त्याचं उद्घाटन खासदार अमोल कोल्हे यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी अनेक राजकीय चर्चांचा त्यांनी खरपूस समाचार घेतला होता. यावेळी त्यांनी माजी खासदार आणि शिवसेना नेते शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यावरही अप्रत्यक्ष टीका केली होती.

काय म्हणाले होते कोल्हे?

“माननीय मुख्यमंत्र्यांविषयी आमच्या मनात आदर आहे. संसदेत महाराष्ट्राची, महाविकास आघाडी आणि मुख्यमंत्र्यांची बाजू कोण मांडतं? हे पण तुम्हाला समजून जाईल. माझ्यावर आणि कार्यकर्त्यांवर टीका करणं हाच जर एक कलमी कार्यक्रम असेल. हा एककलमी कार्यक्रम मुख्यमंत्र्यांच्या नावाखाली लपवला जात असेल. तर माननीय मुख्यमंत्री पदावर आहेत. कारण आदरणीय शरद पवारांच्या आशीर्वाद त्यांच्या डोक्यावर आहे. त्यामुळे ही गोष्ट विसरू नये. महाराष्ट्राचा सरकार हे राज्याच्या हितासाठी आहे. स्वत:च्या स्वार्थासाठी त्याला कुणी नख लावण्याचा प्रयत्न करू नये”,