“भाजपा हा राष्ट्रवादाच्या नावाखाली देशात जातीय तेढ निर्माण करून, मतांच्या धृवीकरणाचा खेळ चालवत आहे. आमचे प्राण गेले तरी चालेल पण, अमरावती भाजपची प्रयोगशाळा होऊ देणार नाही. देशामध्ये ज्या हिंसक घटना घडत आहेत, त्या घटनांमागे भाजपचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष सहभाग असून अमरावती आणि उदयपूरच्या घटनांमध्येही ते दिसून आले आहे.” असा आरोप काँग्रेसच्या नेत्या, माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी आज (सोमवार) पत्रकार परिषदेत केला.

यशोमती ठाकूर म्हणाल्या, “राजस्थानच्या उदयपूरमध्ये कन्हैय्यालाल यांच्या हत्येतील आरोपी मोहम्मद रियाझ अत्तारी हा भाजपाचा कार्यकर्ता निघाला. अमरावतीत उमेश कोल्हे यांच्या हत्या प्रकरणातील सूत्रधार इरफान खान हा खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांचा समर्थक होता. राणा दाम्पत्यासाठी प्रचार करून त्याने मते मागितल्याचे पुरावे समोर आले आहेत. राणा दाम्पत्याचे भाजपाशी असलेले संबंध सर्वश्रृत आहेत. २०२० मध्ये जम्मू-काश्मिरातील दहशतवाद्यांना हत्यारे पुरविण्याच्या आरोपाखाली भाजपाचा नेता तारिक अहमद मीर याला अटक करण्यात आली होती. २०१७ मध्ये मध्यप्रदेशमध्ये ‘एटीएस’ने अवैध टेलिफोन एक्स्चेंज उघडकीस आणून ‘आएसआय’च्या ११ संशयितांना अटक केली होती, त्यात भाजपाच्या ‘आयटी सेल’चा सदस्य ध्रुव सक्सेना देखील होता. अशा अनेक घटना समोर आल्या आहेत. पुलवामा येथे २०० किलो ‘आरडीएक्स’ कसे पोहचले? याचे उत्तर देशाला अजूनपर्यंत मिळालेले नाही. याची चौकशी देखील झाली नाही. राष्ट्रवादाच्या पांघरूणाखाली देशाला पोकळ करण्याचे षडयंत्र भाजपाने रचले आहे.”

अमरावती-उदयपूरच्या घटनेचे सूत्रधार शोधा – डॉ. सुनील देशमुख

तसेच, “उदयपूरची हत्येची घटना २८ जूनला घडली. खासदार नवनीत राणा यांनी देशाचे गृहमंत्री अमित शहा यांना २७ जूनला एक पत्र पाठवून २१ जूनला अमरावतीत घडलेल्या उमेश कोल्हे यांच्या हत्या प्रकरणाची ‘सीबीआय’, ‘एनआयए’ मार्फत चौकशी करावी, अशी मागणी केली. उदयपूरच्या घटनेची पूर्वसूचना खासदारांना होती का, असा प्रश्न त्यामुळे उपस्थित झाला आहे. या प्रकाराची देखील चौकशी झाली पाहिजे.”, असे डॉ. सुनील देशमुख म्हणाले.

राणा दाम्पत्य, डॉ. बोंडे यांना ताब्यात घ्या – दिलीप एडतकर

“अमरावतीच्या घटनेला सूनियोजित म्हणणाऱ्या खासदार डॉ. अनिल बोंडे यांना तसेच आरोपी सूत्रधाराशी संबंध असलेल्या राणा दाम्पत्याला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेऊन या प्रकरणाचे मूळ कुठे आहे, हे शोधले पाहिजे.” अशी मागणी काँग्रेसचे प्रवक्ते दिलीप एडतकर यांनी केली.