महाराष्ट्रात सध्या मोठा फार्स सुरु आहे. ज्याची सुरुवात ५ नोव्हेंबरपासून झाली आहे. सगळ्या माध्यमांनी बातमी दाखवूनही, लावून धरलेली असूनही त्या जमीन घोटाळा प्रकरणात काहीही होताना दिसत नाही. सामान्य माणसाच्या मुलाला आणि अजित पवारांच्या मुलाला समान कायदा लागू होत नाही. अजित पवारांच्या मुलाने १८०० कोटींची जमीन खाऊनही त्याचं नाव FIR मध्येही येत नाही. हे आत्ताचं वास्तव आहे. पार्थ पवारांचं नाव FIR मध्ये असलंच पाहिजे. तसंच अमेडिया कंपनीचं नाव घातलं पाहिजे. मी त्याचसाठी लढा देते आहे. जर एफआयआरमध्ये पार्थ पवारांचं नाव आलं तर अजित पवारांना राजीनामा द्यावाच लागेल असं सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी म्हटलं आहे. एवढंच नाही तर विरोधी पक्षानेही या प्रकरणात लक्ष घातलं पाहिजे अशी माझी नम्र विनंती आहे, असंही
शीतल तेजवानींवरची कारवाई थातुरमातुर
शीतल तेजवानी आणि दिग्विजय पाटील यांच्यावर थातुरमातुर कारवाई झाली आहे. शीतल तेजवानीला अटक झाली कारण ८ तारखेपासून अधिवेशन आहे. आता आकांडतांडव केला जाईल त्यामुळे आम्ही समिती नेमली आहे, एफआयर दाखल केली आहे वगैरे सरकार सांगेल असंही अंजली दमानिया यांनी म्हटलं आहे.
दिग्विजय पाटील यांनी देश कसा काय सोडला?
दिग्विजय पाटील यांची चौकशी झाली आहे त्यानंतर त्यांनी देश सोडला आहे. देश सोडून गेल्यावर परत किती लोक येतात? अनेक लोक चौकशीसाठी येईन अशी ग्वाही देतात. पण येत नाहीत. दिग्विजय पाटील यांना परदेशी जाण्याची संमती दिलीच कशी काय? जर दिग्विजय पाटील आलेच नाहीत तर जबाबदारी कुणाची आहे? त्यांना रोखणं गरजेचं होतं असं मला वाटतं. कारण आत्ताचा जो चार्ज आहे त्यात ७ ते १४ वर्षांची शिक्षेची तरतूद आहे. ज्या अधिकाऱ्यांनी दिग्विजय पाटील यांना परदेशी जाण्याची संमती दिली आहे.शीतल तेजवानी यांना रॉयल ट्रिटमेंट मिळाली, त्यांना पोलिसांनी कसं सोडलं हे सगळं माध्यमांनी दाखवलं त्यानंतर शीतल तेजवानी यांना सामान्य लोकांप्रमाणे वागवलं गेलं हे पाहून मला बरं वाटलं असं अंजली दमानिया यांनी म्हटलं आहे.
सगळं वातावरण सध्याच्या घडीला गढूळ झालंय-दमानिया
सध्याच्या घडीला निवडणुका पाहिल्या, मारामाऱ्या पाहिल्या, पैशांचं वाटप पाहिलं तर आपण कुठे चाललो आहोत? हा प्रश्न मला पडला आहे. मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेट मी मागितली आहे. गौरी गर्जेंच्या आई वडिलांचं म्हणणं मी त्यांच्याकडे मांडणार आहे. त्याचवेळी मी त्यांना सांगणार आहे की अमेडिया कंपनी आणि पार्थ पवारांचं नाव एफआयआरमध्ये आलं पाहिजे. फक्त एक टक्का सहभाग असणाऱ्या पार्टनरचं नाव घालून उपयोग नाही. ९९ टक्के सहभाग असणाऱ्या पार्थ अजित पवार यांचं नाव यात आलं पाहिजे अशी मागणी मी करणार आहे असंही अंजली दमानिया यांनी म्हटलं आहे.
