वर्ध्यात पत्नीची हत्या केल्यानंतर सैनिकाने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. पुलगाव येथील सैन्य दलाच्या दारुगोळा भांडारातील अजयकुमार सिंह याने पत्नी प्रियंका कुमारी (२६) हिच्यावर गोळी झाडत हत्या केली. नंतर स्वतःवर गोळ्या झाडून घेत आत्महत्या केली.

गुरुवारी पहाटे दोन वाजता ही खळबळजनक घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, सैनिक अजयकुमार सिंह भांडारात सेवेत असतानाच कोणालाही सूचित न करता पाणी पिण्याच्या बहाण्याने घरी आला. घरी पोहोचताच त्याने पत्नीची गोळ्या घालून हत्या केली. नंतर त्याने स्वतःवर गोळ्या झाडल्या. गोळीबार झाल्याच्या आवाजाने शेजारी व काही कर्मचारी यांनी घराच्या दिशेने धाव घेतली. अजयकुमारला तात्काळ सावंगीच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र सकाळी सात वाजता त्याचा मृत्यू झाला. दोन वर्षांपूर्वी अजयकुमारचं लग्न झालं होतं. पत्नी गर्भवती असून दोघेही बिहारचे रहिवासी होते. भंडार परिसरात इतरांना प्रवेश करण्यास मनाई आहे. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.