२०१५ मध्ये देशात ९७ मृत्यूंची नोंद

पोलीस कोठडीतील आरोपी किंवा कारागृहातील कैद्यांच्या मृत्यूत महाराष्ट्र आघाडीवर आहे. ‘नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो’च्या आकडेवारीनुसार २०१५मध्ये देशात ९७ अशा मृत्यूंची नोंद झाली. त्यापैकी १९ कोठडी मृत्यू महाराष्ट्रात घडले. मात्र यातील बहुतांश मृत्यू आत्महत्या व आजारपणातून घडलेले आहेत.

राज्यात नोंद झालेल्या कोठडी मृत्यूंमध्ये पोलीस मारहाणीत एक, तपासासाठी नेताना प्रवासादरम्यान अपघाताने एक, आत्महत्येच्या चार, आजारपणामुळे १० मृत्यूंची नोंद झाली आहे. दोनच दिवसांपूर्वी सांगली शहर पोलीस ठाण्यात अधिकाऱ्यांच्या छळातून अनिकेत कोथळे या तरुणाचा मृत्यू झाला. त्याआधी भायखळा कारागृहातील वॉर्डन मंजुळा शेटय़ेची हत्या करण्यात आली.

परदेशात आरोपी किंवा कैद्यांना कागदाचे कपडे मिळतात. स्वच्छतागृहे किंवा शौचालयांचा आवश्यक तेवढाच भाग झाकला जाईल अशा रीतीने दरवाजांची व्यवस्था असते. त्यामुळे आरोपींना एकांत मिळत नाही. तशी पद्धत भारतात सुरू झाल्यास आत्महत्यांची संख्या कमी होऊ शकेल. याशिवाय अटकेपासूनच अचूक वैद्यकीय तपासणी झाल्यास आजारपण बळावण्याचे प्रमाणही कमी होऊ शकेल.

सध्या पोलीस ठाण्यांच्या कोठडीमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. त्यामुळे कोठडीतील मारहाणीचे प्रकार बंद झाले आहेत.

मात्र दबाव वाढल्यास आरोपीला बोलते करण्याच्या प्रयत्नात अपवादात्मक मृत्यू घडतात. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हाताखालच्या सहकाऱ्यांना वेळोवेळी सूचना केल्यास, त्यांच्यावर लक्ष ठेवल्यास, चौकशी करून माहिती घेतल्यास पोलीस अत्याचारातून होणारे मृत्यूही रोखता येतील, असेही त्यांनी सांगितले.

प्रत्येक कोठडी मृत्यू पोलिसांची मारहाण किंवा छळामुळे होतो हा समज चुकीचा आहे. बहुतांश मृत्यू आत्महत्या, आजारपणामुळे घडतात. अटक केल्यानंतर शिक्षा, कारागृहातील वास्तव्य, कुटुंबापासून दूर जाण्याची सल यामुळे आरोपी आपसूक मानसिक दडपणाखाली येतो. हे दडपण सहन न होणाऱ्यांची संख्या जास्त असते. त्यापैकी काही परिधान केलेल्या वस्त्रांचा फास तयार करून संधी मिळताच आत्महत्येचे टोक गाठतात. दडपण सहन न झाल्याने हृदयविकाराच्या झटक्याने किंवा आधीपासून असलेले आजारपण बळावल्याने होणाऱ्या मृत्यूंची संख्या जास्त आहे, असे निवृत्त पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित सांगितले.