पंढरपूर : आषाढी वारीसाठी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी सोहळा ८ जुलै रोजी पंढरपूरला प्रस्थान ठेवणार आहे आणि दि. २४ जुलै रोजी पंढरपूरला पालखी सोहळा पोहचणार आहे. या वर्षी प्रस्थानाची वेळ दुपारी तीनची आहे. १७ दिवस मुक्काम, ४ गोल तर ३ उभे रिंगण होणार असल्याची माहिती पालखी सोहळाप्रमुख ॲड. राजेंद्र उमाप यांनी दिली आहे. तर आषाढी एकादशी २५ जुलै रोजी साजरी होणार आहे. येथील संत ज्ञानेश्वर महाराज मठात आळंदी संस्थानची बैठक पार पाडली.

ऊन, वारा, पाऊस याची तमा न बाळगता शेकडो मैल पायी चालत सावळ्या विठुरायाचे दर्शन घेण्यास भाविक आसुसलेला असतो. शेतकरी जसा मृग नक्षत्र किंवा पावसाची वाट पहात असतो. तशी वारकऱ्यांना आषाढी यात्रेची आस लागलेली असते. अनेक वर्षांपासून चैत्र दशमीला आषाढी यात्रेची तयारी, प्रस्थान आणि इतर विषयांवर आळंदी देवस्थानची बैठक होते. या प्रमाणे येथील संत ज्ञानेश्वर महाराज मठात बैठक पार पडली. या बैठकीला आळंदी संस्थेचे सर्व विश्वस्त आणि दिंडी समाजाचे सर्व प्रतिनिधी उपस्थित होते.

श्री. उमाप यांनी पालखी सोहळ्याचा कार्यक्रम जाहीर केला. ज्येष्ठ वद्य अष्टमी अर्थात बुधवारी (दि. ८ जुलै) आळंदी येथून प्रस्थान, ९ व १० जुलै पुण्यात मुक्काम, ११ व १२ जुलै सासवड मुक्कामी, दि. १३ जुलै रोजी जेजुरी, दि. १४ जुलै रोजी वाल्हे मुक्कामी राहणार आहे. दि. १५ जुलै रोजी नीरा स्नान करून पालखी लोणंद येथे मुक्कमी पुढे दि. १६ जुलै रोजी लोणंद येथून पुढे दुपारी पालखी चांदोबाचा लिंब येथे सोहळ्यातील पहिले उभे रिंगण होऊन पालखी तरडगाव येथे मुक्कामी येणार आहे. दि. १७ जुलै रोजी फलटण, तर १८ जुलै रोजी बरड येथे पालखी विसावणार आहे.

१९ जुलै रोजी नातेपुते येथे पालखी मुक्कामी राहणार आहे. दि २० जुलै रोजी पुरंदवडे येथे पहिले गोल रिंगण होऊन पालखी माळशिरस येथे मुक्कामी असेल. दि. २१ जुलै रोजी खडूस फाटा येथे दुसरे गोल रिंगण होऊन वेळापूर येथे पालखी विसावणार आहे. दि. २२ जुलै रोजी ठाकुरबूवा समाधीजवळ तिसरे गोल रिंगण आणि टप्पा येथे बंधू भेट होऊन पालखी भंडीशेगाव मुक्कामी आहे.

दि. २३ जुलै रोजी बाजीराव विहीर येथे गोल आणि उभे रिंगण होऊन पालखी वाखरी येथे विसावणार आहे. दि. २४ रोजी म्हणजेच आषाढ दशमीला दुपारी उभे रिंगण होऊन सर्व संतांच्या पालखी पंढरपूर येथे मुक्कामी राहणार आहेत. दि. २५ जुलै रोजी आषाढी एकादशी सोहळा होणार आहे. या बैठकीत विविध अडचणी, समस्या शासनस्तरावर मांडून निराकरण करू, असा निर्णय झाला आहे. असे असले तरी आता भाविकांना विठुरायाचे दर्शन आणि पायी वारीची ओढ लागली आहे.