Ashish Shelar मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शनिवारी झालेल्या एका मुलाखतीत उद्धव ठाकरेंबरोबर युती करण्यास, टाळी देण्यास मिळवण्यासाठी सकारात्मक प्रतिसाद दिला. राज ठाकरेंनी महेश मांजरेकर यांना दिलेल्या मुलाखतीत हे वक्तव्य केलं आहे. ज्याला उद्धव ठाकरेंनीही सकारात्मक प्रतिसाद दिला. ज्यानंतर आशिष शेलार यांनी राज ठाकरेंशी असलेले वैयक्तकिक संबंध संपल्याचं म्हटलं आहे.
राज ठाकरे काय म्हणाले?
प्रश्न असा आहे की कुठल्याही मोठ्याही गोष्टीसाठी आमच्यातले वाद (ठाकरे बंधू) आमच्यातली भांडणं ही किरकोळ आहेत. महाराष्ट्र खूप मोठा आहे. या महाराष्ट्राच्या अस्तित्वासाठी, मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी वाद आणि भांडणं या गोष्टी अत्यंत क्षुल्लक आहेत. त्यामुळे एकत्र येणं आणि एकत्र राहणं यात मला काही कठीण गोष्ट वाटत नाही. विषय फक्त इच्छेचा आणि तो माझ्या एकट्याच्या इच्छेचा नाही. सगळ्या महाराष्ट्रातील सर्व राजकीय पक्षांतील मराठी माणसांनी एकत्र येऊन एकच पक्ष काढावा हे माझं म्हणणं आहे. मी शिवसेनेत होतो तेव्हा बाळासाहेब ठाकरेंशिवाय मी कुणाच्या हाताखाली काम करत नव्हतो. उद्धव बरोबर काम तेव्हाही करत होतोच. आता समोरच्यांची इच्छा आहे का की मी बरोबर काम करावं? असा सवाल राज ठाकरेंनी महेश मांजरेकरांना दिलेल्या मुलाखतीत विचारला. त्यानंतर उद्धव ठाकरेंनीही सकारात्मक प्रतिसाद दिला.
उद्धव ठाकरेंचा प्रतिसाद काय?
“अगदी किरकोळ भांडणं बाजूला ठेवायला मी देखील तयार आहे. महाराष्ट्राच्या हितासाठी, मराठीसाठी एकत्र येण्याचं आवाहन करतो. आम्ही जेव्हा लोकसभेच्या वेळी सांगत होतो की गुजरातमध्ये महाराष्ट्रातले उद्योग घेऊन जात आहेत, तेव्हाच विरोध केला असता तर आज ते सरकार तिकडे बसलं नसतं. आज महाराष्ट्राच्या हिताचं विचार करणारं सरकार केंद्रात बसवलं असतं आणि महाराष्ट्रातही त्याच विचाराचं सरकार बसलं असतं. पण तेव्हा पाठिंबा द्यायचा, आता विरोध करायचा. मग परत तडजोड करायची असं नाही. महाराष्ट्राचं हित मग त्याच्या आड जो कुणी येईल त्याला मी घरी बोलवणार नाही, त्याच्या घरी जाणार नाही त्याचं स्वागत करणार नाही हे आधी ठरवा. मग महाराष्ट्राच्या हिताच्या गोष्टी करा. बाकी आमच्यातली भांडणं नव्हतीच पण जी काही होती ती मिटवून टाकली चला. त्यावेळी सगळ्या महाराष्ट्राने ठरवायचं की भाजपाबरोबर जायचं की माझ्याबरोबर. मग काय ते ठरवा. महाराष्ट्राचं हित हे एकच समोर आहे माझ्या. मग या चोरांना गाठीभेटी आणि कळत नकळत प्रचार करायचा नाही ही आधी शपथ घ्यायची शिवरायांपुढे मग टाळी देण्याची हाळी द्यायची.” असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.
आशिष शेलार काय म्हणाले?
वैयक्तिक वगैरे आत्तापर्यंतचे जे शब्द होते ते पुरे करा. माझ्या दृष्टीने वैयक्तिक मित्र होते तो विषय आता संपला, राजकीय भाष्य इतकंच करेन त्या दोघांचा प्रश्न आहे. ते दोन पक्ष आहेत त्यांनी ठरवावं. असं आशिष शेलार यांनी म्हटलं आहे. आशिष शेलार आणि राज ठाकरे या दोघांचे मैत्रीपूर्ण संबंध अनेकदा पाहण्यास मिळाले आहेत. अनेकदा आशिष शेलार कृष्णकुंज आणि आत्ताच्या शिवतीर्थ या ठिकाणी जाऊन राज ठाकरेंना भेटले आहेत. भाजपातल्या इतर कुठल्याही नेत्यांपेक्षा आशिष शेलार आणि राज ठाकरे यांचे संबंध मैत्रीपूर्ण आहेत हे दिसून आलं आहे. मात्र हेच मैत्रीपूर्ण संबंध संपल्याचं आता आशिष शेलार यांनी जाहीर केलं आहे.