राहाता:काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ नवीन आहेत. त्यांना अजून अनुभव यायचा आहे. आम्ही ५०-५० वर्ष काँग्रेसमध्ये काम केले. कोण कोणाला गिळतंय हे आम्ही काँग्रेसमध्ये असताना अनुभवले आहे. सपकाळ यांना गिळल्यावर लक्षात येईल की कुणी कोणाला गिळले, असा टोला माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी सपकाळ यांना लगावत सध्या काँग्रेस दिशाहीन झाल्याने अनेक मातब्बर नेते, कार्यकर्ते काँग्रेस सोडून अन्य पक्षांत जात आहेत, असे चव्हाण म्हणाले.
चव्हाण यांनी आज, सोमवारी शिर्डीत येऊन साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी माध्यमांशी बोलताना चव्हाण म्हणाले, काँग्रेसला फोडण्याची गरज राहिली नाही. कारण काँग्रेसचे नेतृत्व दिशाहीन झाल्याने लोकांना त्या पक्षात भवितव्य दिसत नाही. ही वस्तुस्थिती असल्याने अनेकजण काँग्रेस सोडून अन्य पक्षांत जात आहेत. भाजपची ताकद वाढविणे ही पक्षाचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांची अपेक्षा योग्यच आहे, हे सांगण्याची गरज नाही, असे सांगत चव्हाण म्हणाले, मी माझी दिशा स्वीकारली आहे. मी आहे त्या ठिकाणी समाधानी आहे. राजकीय परिस्थितीचा अंदाज घेऊन लोक वेगवेगळ्या पक्षांत येत-जात राहतात.
पहलगाम हत्याकांडानंतर केंद्र सरकारने पाकिस्तानबाबत कठोर भूमिका घेतली. त्यामुळे पाकिस्तान लवकरच शरणागती पत्कारेल, देशाचे संरक्षण महत्त्वाचा विषय असल्याचे चव्हाण यांनी सांगितले.
अर्थमंत्र्यांची तारेवरची कसरत
राज्याची आर्थिक परिस्थिती लक्षात घेता अर्थमंत्र्यांना फार तारेवरची कसरत करावी लागत आहे, असे सांगून अशोक चव्हाण म्हणाले, काही खात्यांसाठी निधी राखीव असतो, वर्षभरात सरकार आर्थिक शिस्त लावून चांगले काम करेल. कर्जमाफी करण्याबाबत सरकारने संकेत दिले असले तरी योग्य वेळेस सरकार यासंबंधी निर्णय घेईल. सरकारकडे भक्कम बहुमत असल्याने सरकारला कुठलाही धोका नाही.