शिवसेना कोणाची यावरून शिंदे गट आणि ठाकरे गटात जोरदार संघर्ष सुरू आहे. आज शिवसेनेचं धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह कोणाचं या प्रकरणावर निवडणूक आयोगासमोर सुनावणी होत आहे. शिंदे आणि ठाकरे गटाने आपआपली बाजू मांडल्यानंतर आयोग आपला निर्णय देईल. मात्र, त्यापूर्वी काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी या संदर्भात प्रतिक्रिया दिली आहे. भारत जोडो यात्रेची आढावा आज आयोजित करण्यात आली होती. त्यानंतर माध्यमांशी ते बोलत होते. हेही वाचा - चिन्ह गोठवल्यास शिंदे गटाचा ‘प्लॅन बी’ काय? रामदास कदम म्हणाले, “यांना माहिती नाही की…” काय म्हणाले अशोक चव्हाण? “धनुष्यबाण चिन्हाचा निर्णय निष्पक्ष व्हायला हवा. ज्यांनी पक्ष स्थापन केला, तो पक्ष वाढवला त्यांच्या भावनाही लक्षात घेतल्या पाहिजे. आकडेवारी आणि बहुमताबरोबरच लोकांच्या भावना काय आहेत, याचाही विचार व्हावा”, अशी प्रतिक्रिया अशोक चव्हाण यांनी दिली आहे. हेही वाचा - “मनोहर जोशी उद्धव ठाकरेंच्या पाया पडले, पण त्यांनी…”, रामदास कदमांचा गंभीर आरोप दरम्यान, यावेळी त्यांनी शिंदे गटावरही टीका केली. “शिंदे सरकार आल्यानंतर अनेक विकासकामांना स्थगिती देण्यात आली आहे. हे योग्य नाही. सरकारचा दृष्टीकोन व्यापक असायला हवा. महाविकास आघाडी सरकारने घेतलेल्या निर्णयांना स्थगिती दिली नसती, तर राज्य पुढे जाण्यास मदत झाली असती. त्यामुळे शिंदे सरकारला १०० दिवस झाले असले तरी या १०० दिवसांत राज्याचे प्रचंड नुकसान झाले आहे”, असेही ते म्हणाले.