सांगली : करोना संकटामुळे दोन वर्षे केवळ औपचारिकता ठरलेली खरसुंडीच्या चैत्री यात्रेनिमित्त सासनकाठी सोहळा बुधवारी संपन्न झाला. यासाठी महाराष्ट्रासह कर्नाटक, तामिळनाडूसह आंध्र प्रदेशातील लाखो भाविकांनी हजेरी लावली होती.आटपाडी तालुक्यातील खरसुंडी मधील श्री सिद्धनाथचा सासनकाठी सोहळा गुलालाच्या उधळणीत आणि लाखो भाविकांच्या उपस्थितीत बुधवारी पार पडला. शनिवारी श्री सिद्धनाथ व जोगेश्वरी विवाह सोहळा जोगेश्वरी मंदिरात पार पडला.मानाची लोखंडी सासने, नवसाची सासनकाठी व पालखी सोहळा चैत्री यात्रेचा मुख्य सोहळा असतो. सासन काठीही नवसाची असते तर सासनकाठीवर उधळण करण्यात येणारे गुलाल-खोबरे हे पण नवसाचे असते.गेल्या दोन वर्षांपासून करोनाच्या पार्श्वभूमीवर श्री सिद्धनाथ चैत्र यात्रा आणि सासनकाठी सोहळा पार पडला नव्हता. यामुळे यंदाची सिद्धनाथ देवाची चैत्र यात्रा आणि सासनकाठी सोहळा मोठय़ा जोशात साजरा झाला. खरसुंडी ग्रामपंचायत, श्रीनाथ देवस्थान व प्रशासनाने यात्रा सुरळीतपणे पार पाडण्याची जय्यत तयारी केली होती.