कराड : स्वच्छ सर्व्हेक्षण स्पर्धेत देशपातळीवर अव्वल ठरलेल्या कराड नगरपालिकेचा शहरात अस्वच्छता वाढल्याने स्वच्छतेतील क्रमांक घसरल्याची खंत व्यक्त करताना, आता कराडला सर्व सोयींनी युक्त प्रदूषणविरहित शहर बनवायचे असल्याचा निर्धार आमदार डॉ. अतुल भोसले यांनी बोलून दाखवला.कराड पालिकेत स्वच्छ सर्व्हेक्षण आणि माझी वसुंधरा अभियानांतर्गत बैठकीत ते बोलत होते. मुख्याधिकारी प्रशांत व्हटकर, माजी नगराध्यक्ष जयवंत पाटील, ज्येष्ठ नगरसेवक विनायक पावसकर यांच्यासह स्वच्छता दूत, नगरपालिकेचे अधिकारी, कर्मचारी व नागरिक बैठकीला उपस्थित होते.
मुख्याधिकारी प्रशांत व्हटकर यांच्या मार्गदर्शनाखाली कराड नगरपालिका स्वच्छ सर्व्हेक्षण आणि माझी वसुंधरा अभियानात देशात पुन्हा अव्वल करू, असा एकमुखी निर्धार या वेळी करण्यात आला. उपस्थितांनी नागरी समस्या व विकासासंदर्भातील मुद्द्यांवर चर्चाही घडवून आणली.
आमदार डॉ. भोसले पुढे म्हणाले, महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या नावाला साजेसे काम शहरात झाले पाहिजे. पालिकेत एकच सत्ता कायम राहत नसल्याने पूर्वीच्या विकासकामांना खो बसतो. त्यासाठी पालिकेने सन २०३० पर्यंतचा विकासाचा आराखडा आत्ताच बनवायला पाहिजे. राज्य सरकारकडून कराड शहराच्या विकासासाठी आवश्यक निधी आणण्यासाठी मी प्रयत्नशील आहे. स्थानिक राजकारणामध्ये विधानसभेच्या सदस्यांनी किती लक्ष घालावे याचीही मर्यादा आपण राखणे गरजेचे आहे. विकास कामांसंदर्भात आपण सर्वांना बरोबर घेऊ, त्यामुळे शहराचा सर्वसमावेशक विकास होईल. प्रीतिसंगम घाट, कृष्णा- कोयना नद्यांकाठी नेकलेस रोड आदींचा विकास करण्यात येणार आहे. धार्मिक पर्यटनाच्या दृष्टीनेही अनेक ठिकाणे शहर परिसरात आहेत. त्याचाही विकास केला जाईल. कराड शहराला सर्व सोयींनी युक्त प्रदूषणविरहित शहर बनवायचे आहे. त्यामुळे सर्वांना याच शहरात येऊन राहावे, असे वाटेल असे शहर बनवायचे आहे. त्यासाठी सर्वांची साथ महत्त्वाची असल्याचे आमदार डॉ. भोसले यांनी सांगितले.