पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गरीब कल्याण रोजगार अभियानाचं उद्घाटन करताना गलवान व्हॅलीत झालेल्या संघर्षाचा उल्लेख केला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या त्या विधानावरून राज्याचे गृहनिर्माण मंत्री व राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी टीका केली आहे. लष्करातील सर्व जवान भारतीय आहेत, असं ट्विट आव्हाड यांनी केलं आहे.

पंतप्रधानांनी केलेल्या बिहार रेजिमेंटचा उल्लेख करत बिहारमधील नागरिकांनी त्यांच्या पराक्रमाचा अभिमान बाळगावा असं आवाहन केलं होतं. त्यावरून जितेंद्र आव्हाड यांनी टीका केली आहे. “मराठा रेजिमेंटमधील सर्व जवान मराठा नाहीत. गोरखा रायफल्समधील सर्व जवान गोरखा नाहीत. मद्रास रेजिमेंटमधील सर्व जवान तामिळ नाहीत. त्याचप्रमाणे बिहार रेजिमेंटमधील सर्व जवान फक्त बिहारमधील नाहीत. लष्करात जात, धर्म आणि प्रादेशिकवाद घुसवू नका. मोदीजी सर्व जवान हे भारतीय आहेत”, अशा शब्दात आव्हाड यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका केली आहे.

आणखी वाचा- चिनी कंपन्यांसोबत केलेले करार रद्द करण्यात आलेले नाहीत, ठाकरे सरकारची माहिती

आणखी वाचा- ‘याआधी झालेल्या चुका सुधारण्याची हीच वेळ’, मनसेच्या राज्यपालांकडे महत्त्वाच्या मागण्या

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गरीब कल्याण रोजगार अभियानाची बिहारमधून सुरूवात केली. अभियानाचं उद्घाटन करताना मोदी यांनी गलवान व्हॅलीत झालेल्या संघर्षाचा उल्लेख केला होता. ‘लडाखमध्ये लष्कारानं केलेला पराक्रम बिहार रेजिमेंटचा आहे. प्रत्येक बिहारी नागरिकाने याचा अभिमान बाळगायला हवा’, असं मोदी म्हणाले होते. गलवान व्हॅलीत १५ जून रोजी झालेल्या संघर्षात २० भारतीय जवान शहीद झाले होते. शहीद झालेले जवान बिहार रेजिमेंटमधील होते.