मागील काही दिवसांपासून प्रहार संघटनेचे अध्यक्ष आणि आमदार बच्चू कडू सातत्याने शिंदे-फडणवीस सरकारवर 'प्रहार' करत आहेत. त्यांनी पुन्हा एकदा मंत्रीमंडळ विस्तारावरून शिंदे-फडणवीस सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. मंत्रीमंडळ विस्तार न झाल्याने जनतेची कामं खोळंबू लागली आहेत. लवकरात लवकर मंत्रीमंडळ विस्तार व्हायला हवा किंवा मंत्रीमंडळ विस्तार का होत नाही? याबाबत सरकारने स्पष्ट भूमिका मांडली पाहिजे, असं विधान बच्चू कडूंनी केलं. दरम्यान, त्यांनी नुकत्याच पार पडलेल्या विधान परिषद निवडणुकीच्या निकालावरही भाष्य केलं आहे. 'एबीपी माझा'शी संवाद साधताना बच्चू कडू म्हणाले, "विधान परिषद निवडणुकीचा निकाल भाजपा आणि शिंदे गटाला धक्का देणारं होता, असं म्हणता येणार नाही. कारण पाचपैकी एक जागा भाजपानं जिंकली आहे. आणि एका जागेवर अपक्ष उमेदवारानं विजय मिळवला आहे. तर उर्ववरित जागेवर महाविकास आघाडीने बाजी मारली आहे." हेही वाचा- सत्यजित तांबेंना जिंकवण्यासाठी अजित पवारांनी केली मदत? ‘त्या’ विधानावरून नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया! "हे एकूण मतदान पाहिलं तर ते दोन लाखांच्या वरही जात नाही. एकंदरीत दोन ते अडीच लाख मतं आहेत. जुन्या पेन्शनच्या मागणीवरून लोकांचा सरकारवर रोष होता, त्याचेही काही दुष्परिणाम या निवडणुकीत दिसले. पण याचा परिणाम इतर निवडणुकीवर पडेल असं काही दिसत नाही. जशी निवडणूक बदलते, तसे उमेदवार आणि निकालही बदलत असतात, हा आतापर्यंत सगळ्यांचा अनुभव आहे," असंही बच्चू कडू म्हणाले. हेही वाचा- “जगात एकाच व्यक्तीला खूप घाबरते”, थेट नाव घेत पंकजा मुंडेंचं विधान! मंत्रीमंडळ विस्तारावर भाष्य करताना बच्चू कडू म्हणाले, "मला वाटतं मंत्रिमंडळाचा विस्तार केला पाहिजे. मला मंत्री करा, असं मी बिलकूल म्हणत नाही. यापूर्वीही मी यावर स्पष्ट सांगितलं आहे. पण मंत्रीमंडळ विस्तार का केला जात नाही? याबाबत सरकारने भूमिका स्पष्ट केली पाहिजे. मंत्रीमंडळ विस्तार का केला जात नाही, हे किमान त्या ५० आमदारांना तरी सांगितलं पाहिजे. हे मूळ कारण आहे, यामुळे आम्ही विस्तार करत नाही. मंत्रीमंडळ विस्तार न झाल्याने जनतेची कामं खोळंबू लागली आहेत."