Bala Nanadgaonkar : मराठी विजयोत्सवाच्या निमित्ताने राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले. या क्षणामुळे शिवसैनिकांसह मनसैनिकांमध्ये सुद्धा उत्साह दिसून आला.त्यामुळे पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये मराठी शक्ती एकत्रित आली असून मराठीजनांमधून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र यावेत अशी जी अपेक्षा व्यक्त केली जात होती ती पूर्ण झाल्याचं दिसून आली. मराठी मेळाव्यात ठाकरे बंधूंनी वज्रमूठ दाखवून दिली तीच एकीची वज्रमूठ या महाराष्ट्रामध्ये कायम राहावी आणि दोन बंधूंनी एकत्रितपणे आगामी निवडणुकींचा आणि राजकीय आव्हानांचा मुकाबला करावा अशीच प्रतिक्रिया अवघ्या महाराष्ट्रातून येत आहे. दरम्यान बाळा नांदगावकर यांनी एक पोस्ट लिहून त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत.
बाळा नांदगावकर यांनी अनेकदा उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र यावेत म्हणून प्रयत्न केला आहे. एका मुलाखतीत त्यांच्या डोळ्यांत अश्रू आले होते. त्याचप्रमाणे शनिवारी जेव्हा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र आल्याचा क्षण पाहून बाळा नांदगावकर भावनिक झाले. त्यांनी एक खास पोस्ट लिहिली आहे. त्याद्वारे त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
काय आहे बाळा नांदगावकर यांची पोस्ट?
दरम्यान, आज बाळा नांदगावकर यांनी फोटो शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. फोटो शेअर करताना त्यांनी म्हटलं आहे की याचसाठी केला होता अट्टाहास असं म्हणत त्यांनी आपल्या प्रतिक्रिया सोशल मीडियामध्ये व्यक्त केल्या. त्यांनी ठाकरे कुटुंबांचा एकत्रित फोटो शेअर करतानाच आपली मनातील भावना व्यक्त केल्या आहेत. त्यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं आहे की, याचसाठी केला होता अट्टाहास. गेली दोन दशके ज्या सुवर्ण क्षणाची वाट बघत होतो तो आज आला आणि कायमचा मनात घर करून गेला. मा. बाळासाहेब आज जिथे असतील तिथून अतिशय आनंदाने बघत असतील. राजकीय इच्छा आणि महत्त्वाकांक्षेच्या पलिकडे जाऊन मी हाच विचार घेऊन वाटचाल करत राहिलो की ठाकरे एकत्र दिसावे आणि आज मी याची देहा याची डोळा हे बघून सगळ्यात आनंदी झालो. त्यात आज आषाढी सारखा अतिशय पवित्र दिवशी हा आनंद द्विगुणित झाला आहे. आता पांडुरंगाकडे एकच मागणे आहे, जीवनात ही घडी अशीच राहू दे. असं म्हणत बाळा नांदगावकर यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत.