आठ महिन्यांपूर्वी राज्यात मोठं राजकीय नाट्य घडलं. एकनाथ शिंदेंनी ४० आमदारांसह शिवसेनेत बंडखोरी केली. बंडखोरीनंतर एकनाथ शिंदे यांनी भाजपाबरोबर जात सत्ता स्थापन केली. तसेच, बहुमताच्या जोरावर शिंदे गटाला 'शिवसेना' पक्षनाव आणि 'धनुष्यबाण' चिन्ह देण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने काही दिवसांपूर्वी दिला. यानंतर शिवसेना ( ठाकरे गट ) मोठा धक्का बसला आहे. अशातच ठाकरे गटातील परभणीचे खासदार संजय उर्फ बंडू जाधव यांनी खंत व्यक्त करत पक्षाला घरचा आहेर दिला आहे एका कार्यक्रमात बोलताना बंडू जाधव म्हणाले, "अडीच वर्षाचा काळ असाच गेला. तेव्हा आम्हाला सत्तेचा लाभ व्हायला हवा होता, तो झाला नाही. याच्यासारखं दुसरं दु:ख असू शकत नाही, ही वस्तुस्थिती आहे. उद्धव ठाकरेंनी पक्षसंघटनेकडे लक्ष द्यायला हवं होतं. अथवा कोणाला तरी अधिकार द्यायला हवे होते. ते देऊ शकले नाही किंवा स्वत:ही लक्ष दिलं नाही. म्हणून आमच्यावर हा प्रसंग ओढवला, हे सत्य आहे. त्यामुळेच ह्या चोराला संधी मिळाली." हेही वाचा : “देशात सरकार बदलाचे वारे आहेत”, शरद पवारांच्या विधानावर विखे-पाटलांची खोचक टीका; म्हणाले, “रस्त्यावर बसलेल्या पोपटाची…” "तुम्हाला मुख्यमंत्री व्हायचं होतं, तर पोराला मंत्री करायला पाहिजे नव्हतं. पोराला मंत्री व्हायचं होतं, तर तुम्ही मुख्यमंत्री व्हायला नको होतं. तुम्ही खुर्ची आटवल्याने ह्यांना वाटलं उद्या बाप गेल्यावर पोरगं माझ्या बोकांडी बसेल. त्याच्यापेक्षा वेगळी चुल मांडली, तर काय बिघडलं. आणि याच भूमिकेतून ही गद्दारी झाली," असेही बंडू जाधव यांनी सांगितलं.