Baramati Rahuri Byelection Voting: एकीकडे देशात SIR मुळे प्रचंड चर्चा झालेल्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकांचा पहिला टप्पा तर अभिनेता विजयच्या आव्हानामुळे चर्चेत आलेल्या तामिळनाडू विधानसभेसाठी आज मतदान पार पडत आहे. त्याचवेळी दुसरीकडे महाराष्ट्रात प्रचंड चर्चा झालेल्या दोन पोटनिवडणुकांसाठी आज मतदान होत आहे. त्यात अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे रिक्त झालेला बारामती विधानसभा मतदारसंघ व भाजपा आमदार शिवाजी कर्डिले यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या राहुरी विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. सकाळी ७ वाजता या सर्व ठिकाणी रीतसर मतदानाला सुरुवात झाली. मतदानानंतर बारामतीमध्ये उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी भावनिक प्रतिक्रिया दिली.

मतदानानंतर काय म्हणाल्या सुनेत्रा पवार?

आज सकाळी सुनेत्रा पवार यांनी बारामतीच्या काटेवाडीमध्ये मतदानाचा हक्क बजावला. यानंतर माध्यमांशी बोलताना त्या अजित पवार यांच्या आठवणींनी भावुक झाल्याचं पाहायला मिळालं. “सगळ्याच बाजूने ही अत्यंत भावनिक निवडणूक आहे. अजित दादांशिवाय कोणत्याही गोष्टी करण्याची सवय आपल्याला नाहीये. पण आज आपण हे मानून चालायला हवं की दादा आता आपल्यात नाहीत. सगळ्याच बारामतीकरांनी हे लक्षात घेतलं आहे आणि ते मतदानाला बाहेर पडत आहेत. बारामतीची जनता आज कर्तव्य म्हणून मतदानासाठी मोठ्या संख्येनं बाहेर पडताना दिसत आहे. बारामतीची जनता आजचं मतदान अजितदादांनी त्यांच्यासाठी इतकी वर्षं केलेल्या योगदानाची परतफेड म्हणून मतदानासाठी मोठ्या संख्येनं बाहेर पडत आहे”, असं त्या म्हणाल्या.

बारामतीमध्ये सर्व प्रमुख पक्षांचा सुनेत्रा पवारांना पाठिंबा

बारामती व राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी आज २३ एप्रिल रोजी मतदान होत असून ४ मे रोजी पाच राज्यांच्या विधानसभा निकालांवेळीच या दोन्ही पोटनिवडणुकांचेही निकाल जाहीर केले जाणार आहेत. बारामतीमध्ये सुनेत्रा पवार यांची निवडणूक बिनविरोध होणार अशी चर्चा होती. त्यात सर्व प्रमुख पक्षांनी आपापले उमेदवार माघारीदेखील घेतले. शिवाय काँग्रेसनं उभा केलेला उमेदवारदेखील मागे घेण्यात आला. मात्र, त्यानंतरदेखील बारामतीमध्ये इतर सर्व मिळून एकूण २३ उमेदवार सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात उभे आहेत. या पार्श्वभूमीवर निवडणूक बिनविरोध होणार नाही यावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर आज तिथे मतदान पार पडत आहे. बारामती विधानसभा मतदारसंघात सकाळी ११ वाजेपर्यंत २०.५९ टक्के मतदान झालं असून दुसरीकडे राहुरी विधानसभा मतदारसंघात १८.२२ टक्के मतदान झालं आहे.

राहुरीत अक्षय कर्डिलेंसाठी प्रतिष्ठेचा मुद्दा

भारतीय जनता पक्षाचे आमदार शिवाजी कर्डिले यांच्या निधनामुळे अहमदनगरमधील राहुरी विधानसभा मतदारसंघाची जागा रिक्त झाली. त्या जागी पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली. या ठिकाणी सर्व प्रमुख पक्षांनी आपापले उमेदवार दिल्यामुळे ही निवडणूक चुरशीची होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. भाजपाकडून शिवाजी कर्डिले यांचे पुत्र अक्षय कर्डिले यांना उमेदवारी देण्यात आली असून त्यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार गोविंद मोकाटे यांनी कडवं आव्हान उभं केलं आहे. त्यासोबतच शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे बंडखोर उमेदवार रावसाहेब खेवरे अपक्ष म्हणून राहुरीच्या निवडणूक रिंगणात उतरले आहेत. याव्यतिरिक्त वंचित बहुजन आघाडीनेदेखील संतोष चोळके यांना उमेदवारी दिली आहे.

“मतदारांमध्ये मोठी उत्सुकता आहे. पण प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक प्रकारचं दु:ख देखील आहे. शिवाजी कर्डिले यांच्या निधनामुळे या निवडणुकीत हे मतदान करण्याची वेळ प्रत्येकावर आली याचं त्यांना दु:ख आहे. पण आज या वेळेला आम्हाला सर्वांना सामोरं जावं लागत आहे. प्रत्येकाच्या मनातल्या भावना मतांच्या रुपात व्यक्त होणार आहेत. इथे येणारा प्रत्येक व्यक्ती शिवाजी कर्डिले यांच्याबद्दलच्या त्यांच्या भावना मतांमधून व्यक्त करत मला संधी देणार आहेत. या संधीची जाणीव मला आयुष्यभर राहणार आहे. ही निवडणूक मी कधीही विसरू शकणार नाही”, अशी प्रतिक्रिया मतदानानंतर अक्षय कर्डिले यांनी दिली.

बारामती पोटनिवडणुकीत ५८.२८ टक्के मतदान

बारामती मतदारसंघात तीन लाख ८४ हजार ५७९ मतदार असून, त्यापैकी दोन लाख २४ हजार ८७ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदानाला सुकरूवात झाल्यानंतर मतदारांमध्ये फारसा उत्साह दिसून आला नाही, मात्र दिवसाच्या अखेरीस मतदार मतदानासाठी घराबाहेर पडल्याचे पाहायला मिळाले. सायंकाळी पाच वाजेपर्यंत सुमारे ५२.४८ टक्के म्हणजे दोन लाख एक हजार ८०८ मतदारांनी मतदान केले. शेवटच्या काही तासांमध्ये मतदानाचे प्रमाण वाढले. त्यामुळे मतदानाची टक्केवारी सुमारे ५८.२८ टक्क्यांपर्यंत पोहोचली.