भाजपा नेते मोहित कंबोज यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक मोठा नेता लवकरच तुरुंगात जाणार असल्याचा दावा केल्याने खळबळ उडाली आहे. यावरून राजकीय वातावरण चांगलंच तापलं असून अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांनी मोहित कंबोज यांच्या वक्तव्याविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. दरम्यान, कंबोज यांच्या ट्वीटवर शिवसेना नेते भास्कर जाधव यांनी प्रतिक्रिया दिली आहे. किरीट सोमय्या यांचा स्टॉक संपला असल्याने मोहीत कंबोज या नौटंकीबाज व्यक्तीला पुढे आणण्यात येत असल्याचं, ते म्हणाले.

हेही वाचा – मोहित कंबोज यांच्या ट्वीटवर सुप्रिया सुळेंनी दिली प्रतिक्रिया; म्हणाल्या, “ट्वीट करणाऱ्यांना…”

काय म्हणाले भास्कर जाधव?

”भाजपाचे नेता किरीट सोमैया हे मराठी लोकांवर भ्रष्टाचाराचे आरोप लावतात. मात्र, हे आरोप लावता लावला सोमैयांजवळचा स्टॉक आता संपला आहे. त्यामुळे नौटंकी करणाऱ्या मोहीत कंबोज या नव्या माणसाला पुढं आणण्यात आलं आहे. मात्र, जो अन्याय आणि ईडीच्या कारवाया आमच्यावर होत आहे, महाराष्ट्राची जनता हे सर्व बघत आहे आणि जनताच त्यांना उत्तर देईन”, अशी प्रतिक्रिया भास्कर जाधव यांनी दिली आहे.

हेही वाचा – ‘राष्ट्रवादीचा मोठा नेता जेलमध्ये जाणार’ म्हणणाऱ्या मोहित कंबोज यांना मिटकरींचा टोला, म्हणाले “कोणाच्या चड्डीचा नाडा…”

नेमकं काय आहे प्रकरण?

मोहित कंबोज यांनी मंगळवारी काही ट्वीट केले होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक मोठा नेता लवकरच तुरुंगात नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांना भेटणार आहे, असं दावा त्यांनी केला होता. या ट्वीटमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. आणखी एक ट्वीट करत कंबोज यांनी सिंचन घोटळ्याची पुन्हा एकदा चौकशी करण्याची मागणी केली आहे. त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं की, “२०१९ मध्ये परमबीर सिंह यांनी बंद केलेल्या सिंचन घोटाळ्याचा तपास पुन्हा एकदा सुरू करण्यात यावा.”