राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबीचे विभागीय संचालक आणि आर्यन खान ड्रग्ज प्रकरणाचा तपास करणारे समीर वानखेडे यांच्यावर आरोप करण्याचा सपाटाच लावला आहे. आजही पत्रकार परिषद घेत त्यांनी आणखी काही नवे आणि गंभीर आरोप वानखेडेंवर केले आहेत. समीर वानखेडे यांचे आंतरराष्ट्रीय ड्रग्जमाफियाशी संबंध असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. आर्यन खानला ड्रग्ज प्रकरणात अटक केल्यानंतर आतापर्यंत अनेक खुलासे झाले आहेत. आर्यन खान कारवाई प्रकरणातील पंच प्रभाकर साईल यांच्या गौप्यस्फोटामुळे या प्रकरणाला वेगळं वळण लागल आहे. 

दरम्यान, एनसीबीच्या कारवाईबाबत आणखी मोठा गौप्यस्फोट झाला आहे. एनसीबीच्या दुसऱ्या कारवाईबाबत एका पंचाने गौप्यस्फोट केला आहे. खारघरमधील कारवाईच्या वेळी १० ते १२ कोऱ्या कागदावर सह्या घेतल्याचा दावा नायजेरियन नागरिकाच्या अटकेतील कारवाईतील पंच शेखर कांबळे यांनी केला आहे. खारघरमध्ये नायजेरियन नागरिकाला अटक झाली होती. यामध्ये पंच असलेले शेखर कांबळे यांनी एबीपी माझाला ही माहिती दिली आहे. 

शेखर कांबळे म्हणाले, “खारघरमधील केस नंबर ८०\२१ मध्ये नायजेरियन नागरिकाला पकडण्यासाठी गेलो होतो. तेव्हा तो धक्का देऊन पळून गेला. त्यानंतर आम्ही सेक्टर १२ ला गेलो. त्या ठिकाणी नायजेरियन किचन आहे. त्या किचनमध्ये ४० ते ५० नायजेरियन नागरिक होते. एनसीबी अधिकाऱ्यांनी प्रवेश करताच ते पळू लागले. त्यामध्ये दोन नायजेरियन नागरिकांना सहा एनसीबी अधिकाऱ्यांनी पकडले. त्यांना घेऊन गेले. तेव्हा त्यांच्याकडे कोणतेही ड्रग्ज सापडले नाही. त्यांना एनसीबी ऑफिसला घेऊन गेले. त्यातील एकाला सोडण्यात आले आणि एकावर ६० ग्रॅमची रीकवरी दाखवली. त्यानंतर तीन दिवसांनी मला ऑफिसला बोलावले आणि १० ते १२ कोऱ्या कागदावर माझ्या सह्या घेतल्या. या कारवाईत समीर वानखेडे देखील होते त्यांनीच मला पंच होण्यास आणि सही करण्यास सांगितले. काल बाहेर आलेल्या पत्रात या केसचा उल्लेख आहे. खारघरमधील कारवाई बोगस असल्याचे पत्रात म्हटले आहे. त्यामुळे मी घाबरलो आहे.”