शिवसेना खासदार आणि मुख्य प्रवक्ते संजय राऊत यांनी राज्यसभेचे सभापती आणि देशाचे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांना लिहिलेल्या पत्रावरून सध्या मोठा राजकीय वाद सुरू झाला आहे. संजय राऊतांचं हे पत्र सध्या चर्चेत असून त्यानंतर त्यांनी देवेंद्र फडणवीसांना दिलेल्या इशाऱ्यावरून देखील बरेच तर्क-वितर्क लढवले जात आहेत. "आम्ही जर तुमच्या घरात घुसलो, तर तुम्हाला नागपूरलाही जाता येणार नाही. देवेंद्र फडणवीसांना माहितीये मी काय बोलतोय ते", असं राऊत म्हणाले आहेत. त्यावरून आता भाजपाकडून आमदार अतुल भातखळकर यांनी निशाणा साधला आहे. "अहो राऊत, आमचे नेते देवेंद्र फडणवीस यांना असल्या बायकी धमक्या देण्यापेक्षा ईडीला सामोरे जाण्याची हिंमत दाखवा. तुम्ही केलंय, ते तुम्हालाच भोगावं लागणार आहे. थयथयाट करून काय उपयोग?" असं अतुल भातखळकर म्हणाले आहेत. "आता संजय राऊतांची फक्त कीव येते" दरम्यान, संजय राऊतांनी उपराष्ट्रपतींना पाठवलेल्या पत्रावर देखील त्यांनी निशाणा साधला आहे. "संजय राऊतांनी आज राज्यसभेच्या सभापतींना पाठवलेलं पत्र पाहिल्यावर फक्त आणि फक्त संजय राऊतांची कीव येते. कालपर्यंत अर्वाच्य, घाणेरड्या भाषेत देशाच्या पंतप्रधानांपासून भाजपाच्या छोट्या कार्यकर्त्यावर टीका करणारे राऊत साहेब, आता ईडीला सामोरे जा ना? कर नाही त्याला डर कसली? आता राउतांना लोकशाही आठवायला लागली आहे", असं भातखळकर म्हणाले आहेत. "राऊतसाहेब, तुम्ही काळजी करू नका" "राऊत साहेब, तुम्ही काळजी करू नका. ईडी तुमची चौकशी कायद्यानेच करेल. आपण तथाकथित बोगस डिग्रीच्या नावाखाली एका महिलेला ४७ दिवस तुरुंगात पाठवलंत. किरीट सोमय्यांवर हल्ला केल्यानंतर सामनामध्ये त्यांच्या व्यंगाविषयी उल्लेख केलात. त्यामुळे आता तुम्हाला लोकशाही आठवली, तरी कायदा आपलं काम करेल हे त्यांनी लक्षात ठेवावं. तुम्ही कर नसेल, तर घाबरण्याचं कारण नाही. कायद्याला सामोरं जा. अशी भाषा तुम्ही करतच होतात. ती करा. तुमच्यावरच्या कारवाईमुळे महाभकासआघाडी सरकार पडेल वगैरे असल्या भ्रमात राहू नका. तो आमचा हेतू कधीही नव्हता, नाहीये आणि असणारही नाही", असं अतुल भातखळकर म्हणाले आहेत. महाराष्ट्र सरकार पाडण्यासाठी संजय राऊतांना धमकी; म्हणाले, “मदत करा, अन्यथा माजी केंद्रीय मंत्र्यांप्रमाणे तुम्हालाही…” काय म्हणाले होते संजय राऊत? “तुम्ही पाहत राहा आता काय होणार आहे. ईडीच्या ऑफिसमध्ये जाऊन दोन चार लोक जाऊन बसतात आणि सूचना आणि आदेश देतात. मी देवेंद्र फडणवीसांना आवाहन करत आहे आणि त्यांना माहिती आहे मला काय सांगायचे आहे. सरकार पाडण्यासाठी यानंतरही प्रयत्न होतील पण हे पडणार नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या कुटुंबालाही खोटे पुरावे तयार करुन त्रास दिला जात आहे. रोज सकाळी एक माणूस उठतो आणि बेवड्यासारखा बडबडतो आणि त्यावरुन ईडी कारवाई करते. आम्ही तुमच्या घरात घुसलो तर तुम्हाला नागपूरलाही जाता येणार नाही,” असे संजय राऊत म्हणाले आहेत.