ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची रविवारी संध्याकाळी खेडमध्ये जाहीर सभा झाली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटासह भाजपावरही परखड शब्दांमध्ये हल्लाबोल केला. उद्धव ठाकरेंच्या या सभेनंतर त्यावरून राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. भाजपाकडून ही सभा आणि त्यातील उद्धव ठाकरेंच्या भाषणावर टीका-टिप्पणी सुरू झालेली असतानाच विरोधकांकडून मात्र या सभेचं कौतुक केलं जात आहे. या पार्श्वभूमीवर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी या सभेसंदर्भात एक ट्वीट केलं असून उद्धव ठाकरेंना लक्ष्य केलं आहे. "…यांना शरम नाही" खेडमध्ये झालेल्या सभेत उद्धव ठाकरेंनी शिंदे गटावर खोचक शब्दांत टीका केली. “मी घरात बसून महाराष्ट्र सांभाळला, पण तुम्ही दिल्लीसमोर मुजरे करत बसलात. माझ्याबरोबर महाराष्ट्र होता. आपलं जागतिक कौतुक झालं, ते माझं नाही महाराष्ट्राचं कौतुक होतं. गुजरातच्या निवडणुकांसाठी महाराष्ट्रातील उद्योग पळवले. फक्त तुटलेल्या एसटीवर गतिमान महाराष्ट्राची जाहीरात करतात. यांना शरम नाही”, असं उद्धव ठाकरे आपल्या भाषणात म्हणाले. "मी शून्य आहे. माझ्यामागे बाळासाहेब आहेत, म्हणून मला किंमत आहे. पण, गुजरातला सरदार वल्लभभाई पटेल, बंगालमध्ये सुभाषचंद्र बोस आणि इकडे बाळासाहेब चोरले. या चोर वृत्तीला मतदान करणार का? २०२४ साली स्वातंत्र्य लढ्याशी संबंध नसलेला पक्ष गाडून टाकायचा आहे, हा निश्चय करा. नाहीतर २०२४ नंतर आपल्या देशात लोकशाही शिल्लक राहणार नाही", असंही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले. चंद्रशेखर बावनकुळेंचं ट्वीट! दरम्यान, उद्धव ठाकरेंच्या भाषणातल्या एका मुद्द्यावर चंद्रशेखर बावनकुळेंनी ट्वीट करून आक्षेप घेतला आहे. "भाजपाच्या व्यासपीठावर आधी साधू असायचे, आता संधीसाधू असतात - उद्धव ठाकरे…पालघरची घटना इतक्यात विसरलात का?", असा सवाल चंद्रशेखर बावनकुळेंनी ट्वीटच्या माध्यमातून उपस्थित केला आहे. “मी घरात बसून महाराष्ट्र सांभाळला, पण तुम्ही…”, उद्धव ठाकरेंचं एकनाथ शिंदेंवर टीकास्र शिमग्याच्या बोंबा पुरे आता - चंद्रशेखर बावनकुळे या ट्वीटमध्ये बावनकुळेंनी उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात रक्ताचे पाट वाहिल्याचा आरोप केला आहे. "उद्धवजी, तुम्ही मुख्यमंत्री असताना निष्पाप साधूंच्या हत्या झाल्या. मारेकऱ्यांना तुम्ही पोटाशी धरले. रक्ताचे पाट तुमच्यायच कारकिर्दीत वाहिले. शिमग्याच्या बोंबा पुरे आता", असं बावनकुळेंनी या ट्वीटमध्ये म्हटलं आहे. आपल्या भाषणात उद्धव ठाकरेंनी दोन्ही सत्ताधाऱ्यांना लक्ष्य केलेलं असताना आता दोन्ही पक्षांकडून त्यांच्यावर टीका केली जात आहे.