सध्या देशाला करोनाच्या दुसऱ्या लाटेचा मोठा फटका बसला असून आरोग्य सुविधांचा तुटवडा जाणवत आहे. यादरम्यान अनेक राज्यं केंद्राकडे मदत मागत असून ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, रेमडेसिविरचा पुरवठा करण्याची मागणी करत आहेत. करोना रुग्णसंख्येत पहिल्या क्रमांकावर असणाऱ्या महाराष्ट्रातही मोठी समस्या असून राज्य आणि केंद्र सरकारमध्ये मदतीवरुन आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. दरम्यान विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांचा उल्लेख न करता अप्रत्यक्ष टीका केली आहे. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

मोफत लसीकरणाचं ट्विट आदित्य ठाकरेंनी डिलीट केल्याच्या प्रश्नावर संजय राऊत म्हणाले…

देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केंद्राकडून राज्याला देण्यात आलेल्या मदतीची माहिती दिली. “केंद्र सरकारकडून रेमडेसिविरचा मोठा साठा महाराष्ट्राला मिळाला आहे. केंद्र सरकारने साडे सतराशे मेट्रिक टन ऑक्सिजन महाराष्ट्राला दिला आहे. जे बोलघेवडे लोक सातत्याने केंद्र सरकारवर बोलतात त्यांना इतकंच सांगू इच्छितो की, इतर राज्यांपेक्षा दुप्पट कोटा केंद्र सरकारने महाराष्ट्राला दिला आहे. यासोबत मोठ्या प्रमाणात व्हेंटिलेटर दिले आहेत. आजही हवाई दलाच्या माध्यमातून महाराष्ट्रात इतर गोष्टी पोहोचल्या आहेत. त्यामुळे जे कांगावेखोर आहेत त्यांना माझी विनंती आहे, लोक दु:खात असून केंद्र सरकार मदत करत आहे. केंद्राची राज्याला मदत मिळत असून रोज सकाळी उठून कांगावा करु नये,” अशी अप्रत्यक्ष टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

मोफत लसीकरणावरून मंत्र्यांमध्ये चढाओढ

मोफत लसीकरणावरुन राज्य सरकारवर टीका
“पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ‘मन की बात’मध्येही प्रत्येक पात्र नागरिकाला केंद्र सरकार मोफत लसीकरण उपलब्ध करुन देणार असल्याचं जाहीर केलं आहे. त्यामुळे राज्यांवर याचा भार नाही. एखाद्या राज्याला वेगाने लसीकरण करायचं असल्यास बाजारात लस उपलब्ध आहेत. परंतू १०० टक्के भारतीयांकरिता केंद्र सरकारने व्यवस्था निर्माण केली असून लसीकरण होणार आहे. आता वेगवेगळी वक्तव्यं का केली जात आहेत. ट्विट डिलीट का केली जात आहेत याची मला कल्पना नाही. पण पंतप्रधानांनी भूमिका स्पष्ट केली आहे,” असं सांगत फडणवीसांना राज्य सरकारवर निशाणा साधला.

धोरण ठरवलं पाहिजे
“पहिल्याच दिवशी पंतप्रधानांनी भूमिका स्पष्ट केली आहे. त्याच्यात या गोष्टी का येतात याची कल्पना नाही. यासंदर्भात किमान सगळं समजून घेतलं पाहिजे आणि महाविकास आघाडीत एकवाक्यता हवी. आपलं लसीकरण धोरण ठरवलं पाहिजे. गर्दी होण्याची शक्यता आहे. म्हणून आपलं धोरण ठरवलं पाहिजे,” असं मत देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं आहे.