राज्यामध्ये सुरु असणाऱ्या राजकीय संघर्षासंदर्भात भाष्य करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधत आपल्याला पदाची लालसा नसल्याचं म्हटलं आहे. आपण अयोग्य आहोत हे बंडखोर आमदारांनी समोर येऊन सांगावं आपण लगेच राजीनामा देऊ असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्र्यांच्या या भाषणावर भाजपाने पहिली प्रतिक्रिया दिली आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुण्यामध्ये पत्राकारांशी संवाद साधताना मुख्यमंत्र्यांच्या या संवादावर भाष्य केलं आहे.

नक्की वाचा >> ‘संजय राऊत प्रत्यक्षात..’, ‘मंत्रीपद नको पण..’, ‘माझे पुतळे का..’, ‘अन्यथा मी..’; कॉलदरम्यान शिंदेंकडून मुख्यमंत्र्यांवर प्रश्नांचा भडिमार

“ते, त्यांचं मनोगत आहे. यावर माझं नो कॉमेंट. मी काहीही बोलू शकत नाही,” असं चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांनी मुख्यमंत्र्यांच्या फेसबुक लाइव्हसंदर्भात प्रश्न विचारला असता म्हटलं. दरम्यान पुढे बोलताना चंद्रकांत पाटलांनी लगेच पुढच्या वाक्यामध्ये, “हे जे काही शिवसेनेत चाललं आहे त्याच्याशी भाजपाचा काहीही संबंध नाही,” असं स्पष्ट केलं.

नक्की पाहा >> Video: “…तर बाळासाहेब ठाकरेंनी एकनाथ शिंदेंच्या कानाखाली जाळ काढला असता”

राज्यसभा आणि विधान परिषदेच्या निकालानंतर चंद्रकांत पाटलांनी गुलाल उधळून आनंद साजरा केला होता. त्याच गुलालाचा संदर्भ देत, राज्यसभा आणि विधान परिषदेच्या विजयाचा तुमचा तो गुलाल अजून गेला नाही. आता ही विधानसभाची तयारी आहे का? असा प्रश्न चंद्रकांत पाटलांना विचारण्यात आला. त्यावर चंद्रकांत पाटलांनी, “हा गुलाल आता राष्ट्रपतीच्या निवडणुकीसाठी शिल्लक ठेवला आहे,” असे म्हणत डोक्यावरील टोपी काढून दाखवली.

नक्की वाचा >> एकनाथ शिंदेंची आदित्य ठाकरे, संजय राऊतांसोबत बाचाबाची; दोन दिवसांपूर्वीच पडलेली वादाची ठिणगी

राज्यामध्ये मागील काही दिवसांपासून सुरु असणाऱ्या राजकीय घडामोडींवर भाष्य करताना उद्धव ठाकरेंनी या बंडखोर आमादारांना समोर येऊन चर्चा करण्याचं आवाहन केलं आहे. तसेच तुम्हाला मी नकोय असं स्पष्टपणे सांगितल्यास मी लगेच मुख्यमंत्रीपद सोडेन, असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. इतकच नाही तर मुख्यमंत्री आजच आपण मुक्काम वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानावरुन ‘मातोश्री’वर मुक्काम हलवत असल्याचंही सांगितलं.