विधानसभा विरोधी पक्षनेते आणि भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर टीकेची झोड उठवली. सरकारच्या धरसोड वृत्तीवर त्यांनी टीकेचे बाण सोडले. सरकारमध्ये एकवाक्यता नसल्याचंही त्यांनी यावेळी निदर्शनास आणून दिलं. कोविड काळात झालेल्या भ्रष्टाचारावरही त्यांनी बोट ठेवलं. त्याचबरोबर महाराष्ट्रात मृत्यूचं मॉडेल होतं, अशी बोचरी टीकाही त्यांनी केली. मुंबई बाहेरही महाराष्ट्र आहे याकडेही लक्ष वेधत सरकारला धारेवर धरलं.

“याला सरकार म्हणता येईल का? मंत्री आपल्या विभागाचे राजे झाले आहेत. प्रत्येक विभागात एक एक वाझे..ही अवस्था महाराष्ट्राची आपल्याला पाहायला मिळते. गेल्या ६० वर्षात जितका भ्रष्टाचार बघितला नाही तितका आता दिसतोय. कुठल्याही सरकारला एक मुख्यमंत्री असतो. या सरकारमधला मंत्रीही स्वतला मुख्यमंत्री समजतो. राज्यमंत्रीही स्वताला मुख्यमंत्री समजतो. रोज निर्णय होतात. एका तासात स्टे होतात. दुसऱ्या दिवशी रद्द होतात. तिसऱ्या दिवशी पुन्हा घेतले जातात. सरकार आहे, की सर्कस आहे?, अशा प्रकारचा प्रश्न पडवा अशी अवस्था आहे.” अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली.

भाजपाचा रोख आता अजित पवारांच्या दिशेने! ‘या’ प्रकरणात केली CBI चौकशीची मागणी!

“कोविड काळामध्ये महाराष्ट्राची काय अवस्था झाली. कोविड काळात सरकारनं चांगलं काम केलं असं मंत्री आणि काही माध्यमं सांगतात. तेव्हा त्यांना सांगावसं वाटतं. तुमचं डोकं ठिकाणावर आहे का?. देशात सर्वाधिक करोना रुग्ण महाराष्ट्रात होते. किड्या मुंग्यासारखे लोकं मेली. कुठलं मॉडेल आणलं आहे. यशाचं मॉडेल आणलं आहे. मॉडेल जर असेल तर मृत्यूच्या सापळ्याचं मॉडेल आहे. या मृत्यूंचं उत्तर कोण देईल?. उत्तर प्रदेशाच्या गंगा नदीत ५० मृतदेह सापडले. तर दोन दिवस महाराष्ट्रात बातम्या चालतात. बीड जिल्ह्यात २२ मृतदेह कोंबून एका गाडीत त्याची विटंबना केली जाते. त्या संदर्भात काही लोकं मात्र मौन आहेत. बोलत देखील नाहीत. हे मॉडेल आहे.”, करोना काळातील महाराष्ट्र मॉडेलवरही देवेंद्र फडणवीस यांनी टीकास्त्र सोडलं.

अजित पवार म्हणाले, ‘रंग नाही आवडला’; मुख्यमंत्री म्हणाले, ‘रंग बदलण्याचं सरकारमध्ये धाडस’

“पोलीस विभागातला वाझे आपल्याला सापडला. वेगवेगळ्या विभागतले वाझे अजून बाकी आहेत. त्यांचा पत्ता आमच्याकडे आलेला आहे. तो पत्ता आमच्याकडे असल्यामुळेच अधिवेशन दोन दिवसांचं ठेवलं. पुरवण्या मागण्यांशिवाय दुसऱ्या विषयांवर चर्चा करता येणार नाही. कुठल्याही वाझेंचा पत्ता सांगता येणार नाही.”, असा प्रश्नही देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला.