राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी अलीकडेच मंत्रीमंडळ विस्तारावरून मोठं विधान केलं होतं. राज्यात आज मंत्रिमंडळाचा विस्तार झाला तर उद्या सरकार कोसळेल. त्यामुळे राज्यात सरकार कोसळण्याच्या १५ आधी मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, असं विधान एकनाथ खडसेंनी केलं होतं.

एकनाथ खडसेंच्या विधानाचा भारतीय जनता पार्टीचे नेते गिरीश महाजन यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. एकनाथ खडसे यांनी स्वत:ची काळजी करावी. आमची काळजी करू नये. आमचं सरकार सक्षम आहे, असा टोला महाजनांनी लगावला आहे. ते जळगावात प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.

हेही वाचा- CM Eknath Shinde: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना जीवे मारण्याची धमकी; मुख्यमंत्री म्हणतात, “अशाप्रकारचं धाडस…”

एकनाथ खडसेंनी मंत्रीमंडळ विस्तारावरून केलेल्या विधानाबाबत विचारलं असता गिरीश महाजन म्हणाले की, एकनाथ खडसे यांनी स्वत:ची काळजी करावी. आमची काळजी करू नये. आमचं सरकार सक्षम आहे. आमचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोघंही सरकार सांभाळायला आणि विस्तार करायला सक्षम आहेत. त्यामुळे तुम्ही आमची अजिबात काळजी करू नका, तुम्ही स्वत:ची करा, असा टोला गिरीश महाजनांनी लगावला आहे.

हेही वाचा- “सीएम शिंदेंना धमकी देणारे कोण आहेत? हे…” विनायक राऊतांची अमित शाहांकडे चौकशीची मागणी

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जीवे मारण्याची धमकी दिलेल्या प्रकरणावरही महाजनांनी भाष्य केलं आहे. मुख्यमंत्र्यांनी अधिक काळजी घेण्याची गरज आहे.उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली असून खबरदारी बाळगण्याचे आदेश दिले आहेत. सध्या मुख्यमंत्री ज्या पद्धतीने सार्वजनिक कार्यक्रमात वावरत आहेत, त्यामुळे त्यांना विशेष काळजी घेण्याची गरज आहे, असंही महाजन म्हणाले.