भारतीय जनता पक्षाचे नेते, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी सांगली येथील एका कार्यक्रमात बोलताना केलेल्या एका वक्तव्यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता. हर्षवर्धन पाटील यांनी इचलकरंजीची तुलना थेट पाकव्याप्त काश्मीरशी केली होती. त्यामुळे त्यांच्यावर विरोधी पक्षांनी टीकेची झोड उठवली होती. राज्यातील काही ठिकाणी त्यांच्या विधानाच्या निरोधात आंदोलन करत निषेधही व्यक्त करण्यात आला होता. यानंतर आता माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी त्यांच्या इचलकरंजी संदर्भातील विधानावर स्पष्टीकरण दिलं आहे. तसेच आपल्या भाषणाचा विपर्यास करण्यात आला असून आपण तसं विधान केलेलंच नाही, असं हर्षवर्धन पाटील यांनी आता म्हटलं आहे.

हर्षवर्धन पाटील काय म्हणाले?

“इचलकरंजी म्हणजे पाकव्याप्त काश्मीर, असं विधान मी केलेलं नाही. लोकसभेच्या निवडणुकीत तेथे जे खासदार निवडून आले आहेत. त्यांनी जे भाषण केलं होतं त्यांच्या भाषणाला उत्तर देण्याचा प्रयत्न मी केला होता. पण माझ्या त्या विधानाचा विपर्यास करण्यात आला. पण माझं तसं विधान नाही. संपूर्ण भाषण जर आपण पाहिलं तर त्या भाषणाचा जो अर्थ आहे तो असा आहे की, त्या मतदारसंघात अतिशय चुरशीची निवडणूक झाली. तेथे अनेकजण धैर्यशील माने यांच्या पराभवसाठी सज्ज होते. पण अशा परिस्थितीमध्येही धैर्यशील माने हे निवडून आले. या पार्श्वभूमीवर मी बोललो होतो. पण त्याचा विपर्यास करण्यात आला. पण कुठलाही विपर्यास कुणीही करु नये, असं मी याआधीही सांगितलं होतं”, असं हर्षवर्धन पाटील यांनी म्हटलं आहे.

हेही वाचा : Sanjay Raut on Sharad Pawar : “शरद पवार मोठे नटसम्राट, तर भुजबळ…”, संजय राऊत यांचा खोचक टोला कुणाला?

दरम्यान, शिवसेना शिंदे गटाचे नेते धैर्यशील माने हे हातकणंगले लोकसभा मतदारसंघामधून दुसऱ्यांदा खासदार झाले आहेत. धैर्यशील माने यांच्या विजयाबद्दल भारतीय जनता पक्षाचे नेते, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी धैर्यशील माने यांचं अभिनंदन केलं होतं. मात्र, अभिनंदन करताना हर्षवर्धन पाटील यांनी इचलकरंजी तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केली होती.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हर्षवर्धन पाटील काय म्हणाले होते?

सांगलीच्या सभेत हर्षवर्धन पाटील म्हणाले होते की, “मी सर्वात आधी खासदार धैर्यशील माने यांचं अभिनंदन करतो. सर्वांना विनंती करतो की तुम्ही देखील टाळ्या वाजवून माने यांचं अभिनंदन करायला पाहिजे. कारण इचलकरंजी लोकसभा मतदारसंघ हा तसा पाहिला तर पाकव्याप्त काश्मीर मानायला पाहिजे. कारण आजूबाजूला सगळी मोठी वादळं होती. आजूबाजूला सगळ्या शक्ती विरोधात उभ्या ठाकल्या होत्या. काही शक्ती अदृश्य होत्या, तर काही दृश्य स्वरूपाच्या होत्या. या सर्व प्रतिकूल परिस्थितीवर मात करून त्यांनी येथे विजय मिळवला. प्रतिकूल परिस्थितीवर मात करत धैर्यशील माने यांनी या वादळात दिवा लावला. त्यामुळे मी धैर्यशील माने यांचं मनापासून अभिनंदन करतो.”