“भीमा कोरेगाव या ठिकाणी झालेली दंगल कोणीतीरी स्पॉन्सर केली असं त्यावेळी म्हटलं जात होतं. आमचं सरकार असताना शिवसेनाही सोबत होती. शिवसेनेच्या काही मंत्र्यांनीही यावर भाष्य केलं होतं. आता या तपासात राष्ट्रवादी काँग्रेसचे काही नेते तपासात उघड होतील याची त्यांना भिती आहे,” अशी टीका भाजपाचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केला.

“एनआयए ही देशाची सर्वोच्च संस्था आहे. या संस्थेवर शंका घेणं योग्य नाही. एनआयएवर शंका घेणं याचा अर्थ तुमच्या मनात भिती आहे. आपण एसआयटीची चौकशी लावायची आणि चार्ज फ्रेम होऊ द्यायचे नाही, अशी त्यांची इच्छा असावी. या प्रकरणाच्या तपासावर कोणतीही शंका उपस्थित करणं योग्य नाही,” असं मुनगंटीवार यांनी स्पष्ट केलं.

आणखी वाचा – सत्य बाहेर येईल म्हणून ‘एनआयए’कडे तपास दिला; शरद पवारांचा केंद्रावर गंभीर आरोप

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येताच भीमा कोरेगाव प्रकरणाची फेरचौकशी करण्याची मागणी शरद पवार यांनी केली होती. तसे पत्र पवारांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविले होते. पवारांच्या मागणीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांनी गुरुवारीच आढावा घेऊन तपास अधिकाऱ्यांकडे पुरावे मागितले होते. भाजपा आणि महाविकास आघाडीत भीमा कोरेगाव तपासावरून आरोप प्रत्यारोप होणार हे निश्चित असतानाच केंद्रीय गृहमंत्रालयाने महाविकास आघाडीला झटका दिला. हा तपास केंद्रीय यंत्रणेकडे गेल्याने राज्याला आता वेगळा तपास किंवा चौकशी करता येणार नाही.