मंगळवारी (६ डिसेंबर) महाराष्ट्राच्या वाहनांवर महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर हल्ला करण्यात आला. या हल्ल्यानंतर राज्यातील वातावरण ढवळून निघाले आहे. उद्धव ठाकरे गट, राष्ट्रवादी तसेच काँग्रेस पक्षांकडून शिंदे सरकारवर कठोर शब्दांत टीका केली जात आहे. असे असतानाच आज ठाकरे गटाचे नेते तथा खासदार संजय राऊत यांनी राज्य सरकारवर नामर्द, षंढ सरकार म्हणत टीका केली आहे. संजय राऊतांच्या याच टीकेला भाजपाचे नेते तथा मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी प्रत्युत्तर दिले आहे. 'टीव्ही ९ मराठी'ने याबाबतचे वृत्त दिले आहे. हेही वाचा >> आता संसदेतही गाजणार महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद! हिवाळी अधिवेशनात ठाकरे गट होणार आक्रमक "मागील अडीच वर्षांत त्यांचे सरकार (महाविकास आघाडी) होते. त्यावेळी त्यांनी का मर्दानगी दाखवली नाही. स्वत: आत्मचिंतन करून स्वत:ला उपमा देण्याचे काम तेच करू शकतात," अशी खोचक टीका सुधीर मुनगंटीवार यांनी केली. हेही वाचा >> “…तर अख्खा महाराष्ट्र कर्नाटकात असेल”, शरद पवारांच्या अल्टिमेटमनंतर रोहित पवार आक्रमक; सीमाप्रश्नी राज्य सरकारवर गंभीर आरोप संजय राऊत काय म्हणाले? संजय राऊत यांनी शिदे गट-भाजपा सरकारवर टीका केली आहे.“यांना आपल्या महाराष्ट्राच्या जनतेची, सीमांची काळजी नाही. १०५ हुतात्म्यांनी रक्ताचं पाणी करून हा महाराष्ट्र आणि मुंबई मिळवली. पण सरळ हे सीमा कुरतडतायत. सरकार मात्र षंढासारखं आणि नामर्दासारखं बसलंय. हे नामर्द सरकारच आहे. अशा वेळी विरोधी पक्षाची जबाबदारी सगळ्यात जास्त आहे. तीन महिन्यांपासून सरकारने महाराष्ट्राचं दिल्लीतल्या दारातलं पायपुसणं करून टाकलं आहे”, असे राऊत म्हणाले.