scorecardresearch

सातारा : “राहुल गांधींकडे परिपक्वता नाही”, भाजपा नेते विनोद तावडे यांची टीका

द्वेषयुक्त वक्तव्यं करणे, परदेशात देशाविरोधात बोलणे अशा घटना पाहता राहुल गांधींकडे राजकीय परिपक्वता दिसत नाही, अशी टीका भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी कराडमध्ये पत्रकार परिषदेत केली.

Vinod Tawde on rahul gandhi
"राहुल गांधींकडे परिपक्वता नाही", भाजपा नेते विनोद तावडे यांची टीका (छायाचित्र – लोकसत्ता टीम/ग्राफिक्स)

कराड : “सुरत न्यायालयाने मानहानीच्या खटल्यात राहुल गांधींना शिक्षा सुनावली असली तरी न्यायालयाचा निर्णय मान्य नसल्याचे म्हणणे, यापूर्वी द्वेषयुक्त वक्तव्यं करणे, परदेशात देशाविरोधात बोलणे अशा घटना पाहता राहुल गांधींकडे राजकीय परिपक्वता दिसत नाही”, अशी टीका भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी कराडमध्ये पत्रकार परिषदेत केली.

तावडे म्हणाले की, माजी पंतप्रधान इंदिरा गांधी व अटलबिहारी वाजपेयी यांनाही परदेशात भारताबद्दल प्रश्न विचारले असता, यावर त्यांनी आपल्या देशात गेल्यावर बोलू असे सांगितले होते. पण, राहुल गांधींनी परदेशात भारताविरोधी वक्तव्य केल्याने त्यांच्याकडे समजूतदारपणा नसल्याचे दिसले. त्यांच्या अशा अनेक घटनांमुळे या नेतृत्वाखाली विरोधक लोकसभा निवडणुकीचा सामना कसा करणार, अशी खिल्ली तावडे यांनी उडवली. लोकसभेची २०२४ ची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून भाजपाची लोकसभा प्रवास अभियानातून तयारी सुरू आहे. ज्या त्या राज्यातील बदलती समीकरणे विचारात घेऊन रणनीती आखली जात आहे. या अभियानातून केंद्रातील म्हणजेच दिल्लीतील ४० मंत्री गल्लीत येत भाजपा सरकारच्या योजना तळागळात प्रभावीपणे पोहोचल्यात का? याचा आढावा घेताना सर्वसामान्यांचे म्हणणे दिल्लीपर्यंत पोहोचवत असल्याचे तावडे यांनी सांगितले. मित्रपक्षांच्या मतदारसंघातही भाजपाने तयारी केली आहे. कारण राष्ट्रीय लोकशाही आघाडी मजबूत रहावी, आघाडीचे सर्व उमेदवार विजयी व्हावेत असे धोरण असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा – भाजपा दिल्ली संघटनेची कमान आता वीरेंद्र सचदेवांच्या हातात; निर्वासित पंजाबी आणि व्यापारी समुदायाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न

राज्यात २०१४ च्या निवडणुकीत सर्वपक्ष स्वतंत्र लढले. त्यात भाजपाला २९ टक्के, शिवसेनेला १९, काँग्रेसला १८ तर, राष्ट्रवादी काँग्रेसला १७ टक्के मतदान मिळाले होते. याचा विचार करून आमची मोर्चेबांधणी आहे. शिवसेनेकडील बहुतांश मतदार हा निव्वळ हिंदुत्ववादी असून, अलिकडच्या घडामोडींमुळे शिवसेनेपासून दुरावला. हा मतदार भाजपाकडे यावा हे विशेष लक्ष्य आहे. त्यातून भाजपाच्या मतांची टक्केवारी २९ वरून ४५ ते ५० टक्क्यांपुढे पोहोचेल, असा विश्वास तावडे यांनी व्यक्त केला.

हेही वाचा – राहुल गांधींची खासदारकी रद्द, आदित्य ठाकरेंचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, “देशात…”

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी केवळ हिंदुत्वाचाच विचार केला. पण, २०१९ च्या निवडणुकीनंतर उद्धव ठाकरे हे हिंदुत्व व राम मंदिराला विरोध करणाऱ्यांच्या मांडीला मांडी लावून बसल्याने त्यांचा पक्ष संपला, अशी टीका तावडे यांनी केली. विरोधक इव्हीएम मशीनबाबत प्रश्न उपस्थित करीत असल्याबाबत विचारले असता तावडे म्हणाले की, अलीकडे झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये काही राज्यांत काँग्रेसची सत्ता आली. त्यावेळी ‘इव्हीएम’बाबत तक्रार झाली का, असा प्रश्न तावडे यांनी केला. सध्यातरी भाजपा व मनसेची युती होईल, अशी शक्यता नसल्याचे ते म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 24-03-2023 at 19:48 IST

संबंधित बातम्या