शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ‘सामना’ला दिलेल्या मुलाखतीत बंडखोर आमदारांवर जोरदार टीका केली असून ‘सडलेली पानं’, ‘पालापोचाळा’, ‘आईला गिळणारी औलाद’, ‘विश्वासघातकी’ असे उल्लेख केले आहेत. उद्धव ठाकरेंच्या टीकेला शिंदे गटाकडून प्रत्युत्तर दिलं जात असून भाजपा नेतेही यावर नाराजी जाहीर करत आहेत. यादरम्यान भाजपाचे खासदार अनिल बोंडे यांनी एबीपी माझाशी बोलताना उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे.

Uddhav Thackeray Interview: पुन्हा शिवसेनेचा मुख्यमंत्री ते मुंबई पालिका निवडणूक, पाहा उद्धव ठाकरेंची संपूर्ण मुलाखत

“आपल्याच पक्षातून गेलेल्या लोकांना बोलताना त्यांनाही दु:ख होत असेल. सगळं शेतच जर पाखरांनी खाल्लं असेल, तर शेतकऱ्याने कितीही कपाळावर हात मारला आणि पालापाचोळा म्हटलं तरी उपयोग नाही,” असं अनिल बोंडे म्हणाले आहेत.

एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया –

“त्यांना आणखी काही बोलायचं आहे ते बोलून होऊ द्या. पूर्ण बोलून झालं की मग मी एकत्रित त्यावर बोलन. त्यांना वाटतं आम्ही पालापाचोळा आहे, पण या पालापाचोळ्यानेच इतिहास घडवला आहे. हे जनतेला माहिती आहे. इतिहास घडवणारे कोण असतात हे लोकांनी पाहिलं आहे,” अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.

Uddhav Thackeray Birthday: एकनाथ शिंदेंकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा, पण चर्चा त्यांनी उल्लेख केलेल्या पदाची, म्हणाले “महाराष्ट्राचे…”

“आमची लढाई सत्तेसाठी नाही. आमची लढाई शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांसाठी होती. त्यातूनच आम्ही ही भूमिका घेतली आहे. त्यामुळे पालापाचोळा, पानगळ जे म्हणायचं आहे तो त्यांचा अधिकार आहे,” असं मत एकनाथ शिंदेंनी व्यक्त केलं.

उद्धव ठाकरे काय म्हणाले?

“मी मागे एकदा माझ्या मनोगतात म्हटलं होतं की, ज्या वेळी मी ‘वर्षा’त राहात होतो तेव्हाचा अनुभव कथन केला होता. या घराच्या आवारातच दोन झाडं आहेत. एक आहे गुलमोहराचं आणि दुसरं आहे बदामाचं. दोन्ही झाडं मी साधारणतः गेली दोन-एक वर्षे बघतोय. ज्याला आपण पानगळ म्हणतो. त्यात पानं पूर्ण गळून पडतात. फक्त काडय़ा राहतात. आपल्याला वाटतं, अरे या झाडाला काय झालं? पण दोन ते तीन दिवसांत पुन्हा नवीन कोंब येतात, अंकुर येतात आणि मी बघितलंय, आठ ते दहा दिवसांत ते बदामाचं झाड पुन्हा हिरवंगार झालं. गुलमोहरसुद्धा हिरवागार झाला. म्हणून ही सडलेली पानं असतात ती झडलीच पाहिजेत. जी पाने झडताहेत ती सडलेली पाने आहेत. त्यांना झडून जाऊ द्या,” असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

“इकडून पालापाचोळा तिकडे जातोय, जी पानं गळणं गरजेची होती ती पानं उडतात”

“खरं सांगायचं तर मला चिंता नाहीये. चिंता माझी नाहीये, शिवसेनेची तर बिलकूल नाहीये. मात्र थोडीफार चिंता आहे ती नक्कीच मराठी माणसांची, हिंदूंची आणि हिंदुत्वाची आहे. याचं कारण हिंदुद्वेष्टे, मराठीद्वेष्टे हे आपल्या घरातच आहेत. मराठी माणसांची एकजूट तुटावी, हिंदूंमध्ये फूट पडावी आणि मराठी माणसाची, हिंदूंची एकजूट करण्यासाठी जी मेहनत माननीय शिवसेनाप्रमुखांनी हयातभर केली ती आपल्याच काही कपाळकरंटय़ांच्या हातून तोडावी, मोडावी असा हा प्रयत्न केला जातोय याची मला चिंता आहे. म्हणून मी जे म्हटलं की, हा पालापाचोळा सध्या उडतोय; तो उडू द्या. इकडून पालापाचोळा तिकडे जातोय, जी पानं गळणं गरजेची होती ती पानं उडतात. म्हणजे नवी पालवी फुटेल,” अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली.