शिवसेनेचे माजी खासदार अनंत गीते यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यामुळे सध्या राजकीय नेत्यांकडून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. एकीकडे शिवसेनेने अनंत गीते यांच्या वक्तव्यापासून फारकत घेतली असून दुसरीकडे राष्ट्रवादीने त्यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. अडगळीतले नेते असा उल्लेख करत सुनील तटकरे यांनी अनंत गीते यांच्या टीकेला उत्तर दिलं आहे, दरम्यान भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी अनंत गीतेंनी मांडलेला मुद्दा वास्तववादी चित्र आहे असं सागंत त्यांची बाजू घेतली आहे. झी २४ तासला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी यावर प्रतिक्रिया दिली.

शिवसैनिकांची खदखद का वाढलीय?, नारायण राणेंनी दिलं उत्तर; म्हणाले, “पक्षात मंत्र्यांना..”

“अनंत गीतेंनी मांडलेला मुद्दा वास्तववादी चित्र आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीची तडजोड पदांसाठीच झाली आहे. यामध्ये हिंदुत्वाचा आणि निष्ठेचाही भाग नाही. शिवसेनेने तर मुख्यमंत्रीपदासाठी हिंदुत्त्वाला मूठमाती दिली. त्यामुळे शिवसेनेला हिंदुत्वावर बोलण्याचा अधिकार नाही, अनंत गीतेंनी सांगितलं ते १०० टक्के खरं आहे,” असं नारायण राणे म्हणाले आहेत.

अनंत गीतेंच्या शरद पवारांवरील वक्तव्यावर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…

दरम्यान, गीते यांच्यावर कारवाई केली जाणार आहे, यावर बोलताना राणे म्हणाले, “अजून काय वाकडं करू शकतात. गीते यांना कदाचित फासावर लटकवतील. यांना दुसरं काय येतं. अनंत गीतेंची जी अवस्था आहे तीच शिवसैनिकांची आहे. कोणीच त्यांना विचारत नाही”. अनंत गीतेंचं चुकतंय कुठे अशी विचारणाही यावेळी त्यांनी केली.

अनंत गीते यांनी काय म्हटलं आहे –

अनंत गीते यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केली आहे. राष्ट्रवादीचा जन्म काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसून झाला, पवार आमचे नेते होऊ शकत नाहीत, आमचे नेते बाळासाहेब ठाकरेच असं सांगत गीतेंनी राष्ट्रवादी काँग्रेसवर तोफ डागली.

”काँग्रेस सुद्धा काँग्रेस आहे, राष्ट्रवादी सुद्धा काँग्रेस आहे, तरी एकमेकांचे तोंड बघत होते का? एकमेकांचे कधी जमत होते का? यांचा विचार एक आहे का ? दोन काँग्रेस एक विचारांची होऊ शकत नाही तर शिवसेना ही काँग्रेस विचारांची कदापि होऊ शकणार नाही. मुळात राष्ट्रवादी काँग्रेसचा जन्मच काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसून झाला आहे. दुसरा कुठलाही नेता, त्याला जगाने कितीही उपाध्या देवोत, त्याला कोणी जाणता राजा म्हणो, पण आमचा गुरु तो होऊ शकत नाही, आमचे गुरु फक्त बाळासाहेर ठाकरे. महाविकास आघाडी ही सत्तेची तडतोड आहे. ” असं वक्तव्य अनंत गीते यांनी केलं होतं.