भाजपाविरोधात एकही बातमी येऊ नये, यासाठी पत्रकारांना ढाब्यावर न्या, त्यांना चहा पाजा, अशा आशयाचं विधान भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं आहे. बावनकुळेंच्या या वक्तव्यावर राजकीय मंडळींकडून टीका केली जात आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) खासदार सुप्रिया सुळे यांनी ‘एक्स’वर (ट्विटर) हेरंब कुलकर्णी यांची कविता शेअर करत भाजपावर टीकास्र सोडलं. यानंतर आता भाजपाने एक कविता शेअर करत सुप्रिया सुळेंवर टोलेबाजी केली आहे.
सुप्रिया सुळेंच्या पोस्टला रिपोस्ट करत भाजपाने म्हटलं, “दहा कोटींची वांगी.. उगवते माझ्या शेतात.. कोणती ही मशागत?.. चर्चा जनमाणसात.., बारा बॉम्बस्फोटांनी मुंबईकर हादरला..’ते’रावा स्फोट माझ्या पप्पांनी घडवला.. अतिरेक्यांच्या मैफिलीत अवघा ‘शरद’ बहरला”
“आम्हा, बाप – लेकीला, आस एक लावसाची.. जमीन लाटून कष्टकऱ्यांची.. माडी उभारू ‘शरदचंद्रा’ची.. राजकीय कारकिर्द ५३ वर्षांची.. हौस भारी बिरुदे मिरवण्याची.. काय सांगू माझ्या पप्पांची महती, जिथे तिथे फक्त खंजीरच खुपसती..” अशी टोलेबाजी भाजपाने केली आहे.
हेही वाचा- “मी दररोज बँकांच्या पाया पडतेय”, आर्थिक तंगीबाबत पंकजा मुंडेंनी मांडली व्यथा
सुप्रिया सुळेंनी पोस्ट केलेल्या कवितेत काय?
सुप्रिया सुळेंनी पोस्ट केलेल्या हेरंब कुलकर्णींच्या कवितेमध्ये बावनकुळेंच्या वक्तव्यावर टोलेबाजी केली आहे. “चला, आपण धाब्यावर जाऊ.. मी त्यांना म्हणालो, पाण्यात तरंगणारे तुमचे नागपूर शहर आपण पाहू. तर ते म्हणाले नको नको..त्यापेक्षा आपण धाब्यावरच जाऊ”, असं या कवितेचं पहिलं कडवं आहे.
“धाब्यावर जाताच मी म्हणालो..दारू दुकाने वाढवण्याची. निषेधार्ह बातमी दाखवू का? ते म्हणाले हली ती चव आत्ता तुम्हाला चाखवू का? मी विचारले सहजपणे. समृद्धी महामार्गावर अपघात का बरे वाढले? प्रश्न दाबायला त्यांनी मग पाकीटच बाहेर काढले”, अशा शब्दरचनेतून कवितेमधून बावनकुळेंच्या त्या विधानावर खोचक टीका करण्यात आली आहे.
हेही वाचा- “ती नोटीस नव्हे, कारवाई आहे”, बावनकुळेंच्या ‘त्या’ विधानावर पंकजा मुंडेंचं उत्तर
काय म्हणाले होते चंद्रशेखर बावनकुळे?
चंद्रशेखर बावनकुळे यांनी २४ ऑगस्ट रोजी अहमदनगरच्या सावेडीमध्ये भाजपा पदाधिकारी व बूथ कार्यकर्त्यांची बैठक घेतली या बैठकीत त्यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांना माध्यम प्रतिनिधींशी विशिष्ट पद्धतीने वागण्याचा सल्ला दिला. “पत्रकारांनी २०२४ पर्यंत आपल्याविरोधात (भाजपा) बातम्या छापू नये, यासाठी त्यांना चहा प्यायला न्या. पत्रकारांना चहा प्यायला न्यायचं म्हणजे काय ते तुम्हाला समजलंच असेल. तसेच पत्रकारांना ढाब्यावर जेवायला घेऊन जा”, असं त्यांनी म्हटल्याचं व्हायरल क्लिपमध्ये ऐकू येत आहे.