|| संतोष मासोळेमहापौरपदावर भाजपचे प्रदीप कर्पे विराजमानधुळे : शहराच्या महापौरपदी भाजपचे प्रदीप कर्पे हे विराजमान झाले. बहुमत असल्याने कर्पे हे महापौर होणार हे स्पष्ट असताना महाविकास आघाडीने सांगली, जळगाव पाठोपाठ धुळ्यातही भाजपच्या हातून महापालिका हिसकावून घेण्याचा चमत्कार करण्याची हवा तयार केली, पण प्रत्यक्षात भाजपने या निवडणुकीतून महाविकास आघाडीतील बेबनाव समोर आणला. भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल आणि माजी आमदार राजवर्धन कदमबांडे यांच्या नियोजनाने भाजपला धुळे महापालिकेवरील एकहाती सत्ता कायम राखता आली. सत्ता राखली असली तरी पुढील काळात शहर विकासाचा ठप्प पडलेला गाडा मार्गी लावण्याचे आव्हान नूतन महापौर प्रदीप कर्पे यांच्यासमोर राहणार आहे. गेल्या अडीच वर्षांच्या कार्यकाळात महापालिकेचा कारभार ज्या प्रकारे झाला, त्यातून भाजपमध्ये अंतर्गत नाराजी निर्माण झाली. महापालिकेच्या सर्वसाधारण सभा, स्थायी समितींच्या बैठका, अन्य आढावा बैठका यात विरोधी पक्षांपेक्षा सत्ताधारी पक्षाचेच नगरसेवक मनपा प्रशासनावर व त्या अनुषंगाने आपल्याच पक्षाच्या सत्ताधारी पदाधिकाऱ्यांवर निशाणा साधताना दिसले. ही नाराजी काही निवडकांची आहे की नाराजांचा गट तयार झाला आहे, हे चर्चेत राहिले. मनपातील नाराज मंडळींना शांत करण्याचे आव्हान अनुप अग्रवाल यांच्या समोर वाढत गेले. महापौर निवडीच्या आधी १७ भाजप नगरसेवकांचा गट फुटणार, अशी जोरदार चर्चा सुरू होती. जळगाव, सांगली येथील अनुभव भाजपला असल्याने वरिष्ठांनी धुळ्यातील महापौर निवड अतिशय गांभीर्याने घेतली होती. पक्षाने महापौर निवडीसाठी निरीक्षक नेमले. सर्व नगरसेवकांना एकत्र ठेवण्याची जबाबदारी अग्रवाल यांच्याकडे सोपवली. त्यांनी धुळ्यात पक्षनिरीक्षकांची बैठक होताच सर्व नगरसेवकांना दीव, दमण येथे पर्यटनासाठी रवाना केले. विरोधकांशी चर्चेसाठी वेळच मिळू दिला नाही. पक्षांतील ज्या नगरसेवकांना महापौरपदाची निवडणूक लढण्याची इच्छा होती, त्यांना अर्ज भरण्याची संधीसुद्धा मिळाली नाही. अखेरच्या दिवशी केवळ प्रदीप कर्पे यांनाच दमण येथून धुळ्यात बोलावून केवळ त्यांचाच अर्ज दाखल केला. इतर कोणताही पर्याय भाजपच्या नगरसेवकांना शिल्लक ठेवण्यात आला नाही. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष रणजित भोसले यांनी महापालिकेत एक बैठक घेतली. परंतु, राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनीच तिला फारसे महत्त्व दिले नसल्याचे सांगितले जाते. महापौर निवडणुकीत विरोधी पक्षात प्रामुख्याने राष्ट्रवादी गडबड करू शकते, हे लक्षात घेऊन भाजपने माजी आमदार राजवर्धन कदमबांडे यांच्या मर्जीतील नगरसेवकांना शांत ठेवण्याचे काम चोखपणे त्यांच्याकडून करवून घेतले. राष्ट्रवादीच्या नगरसेवकांमध्ये आजही त्यांच्या शब्दाला किंमत आहे. त्याच वेळी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अंतर्गत रस्सीखेच सुरूच आहे. माजी आमदार अनिल गोटे जिल्हा नेते असले तरी त्यांनी स्वत: मात्र महापौर निवडीत काहीही स्वारस्य दाखवले नाही. अशा वेळी महाविकास आघाडीत एकवाक्यता राहिली नाही. याचा सरळ सरळ लाभ भाजपला झाला. शिवसेनेकडे एकच नगरसेवक असल्याने शिवसेना खरे तर स्पर्धेत नव्हती. काँग्रेस-राष्ट्रवादी आणि इतरांना एकत्र आणून बदल घडवण्याच्या ताकतीचा नेता नव्हता. राष्ट्रवादीतून आलेले कदमबांडे असो वा काँग्रेसमधून आलेले अमरिशभाई पटेल असो, भाजपने त्यांचा योग्य प्रकारे उपयोग करवून घेतला.