देशातील कोळसा संकटाचा उल्लेख करत राज्यात आगामी काळात होणाऱ्या भारनियमनाचं संकट महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये अधिक दाहक होण्याची चिन्हं दिसत असतानाच आज भाजपाने जळगावमध्ये भारनियमनाविरोधात आक्रोश आंदोलन केलं. मात्र या आंदोलनावर प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी भाजपाने इंधनदरवाढीविरोधातही आंदोलन करावं असा टोला लगावला आहे. राज्य सरकारविरोधात वीजेच्या मागणीसाठी आंदोलन करायचं अन् इंधनदरवाढीविरोधात ब्र सुद्धा काढायचा नाही ही दुटप्पी भूमिका असल्याचा टोला खडसेंनी भाजपाला लगावलाय.

राज्यामधील आघाडीविरोधात आक्रोश मोर्चा काढलाय. लोडशेडिंगविरोधात भाजपाने आज आक्रोश मोर्चा काढलाय, याबद्दल तुम्हाला काय वाटतं, असं पत्रकारांनी खडसेंना विचारलं. त्यावर उत्तर देताना, “मला वाटतं शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवताना डिझेल, पेट्रोल महाग झालंय. घरचा गॅस महाग झालाय. औद्योगिक गॅस महाग झालाय. विमानभाडं महाग झालंय. रेल्वे भाड्यात वाढ होण्याची शक्यता आहे. लोखंडाचे दर वाढले, सिमेंटचे दर वाढलेत. दिवसोंदिवस सर्वत्र जी महागाई वाढतेय. याच्याविरोधात त्यांनी आक्रोश आंदोलन केलं असतं तर बरं वाटलं असतं,” असा टोला लगावला.

“एकीकडे राज्य सरकारविरोधात लोडशेडिंगसाठी आंदोलन करायचं आणि दुसरीकडे केंद्र सरकारने पेट्रोल डिझेलचे भाव वाढवलेत तर त्याबद्दल ब्र सुद्धा काढायचा नाही. हा दुटप्पीपणा आहे,” असंही खडसे म्हणाले. तसेच पुढे बोलताना त्यांनी, वीजेची टंचाई आहे हे मान्य करुन चालावं लागले.
ही टंचाई आजची आहे असं नाही. दरवर्षी ही उन्हाळ्यात ही आपल्याला जाणवते. यावर मार्ग काढण्याचा सरकार प्रयत्न करतंय,” असं म्हटलं.

भाजपाच्या कालावधीमध्ये वीज जात होती असं म्हणत भाजपाच्या काळात लोडशेडिंग होत असल्याचा भाजपाचा दावा खडसेंनी खोडून काढला.
“भाजपाचा जाहीरनामा तयार करणाऱ्या समितीचा मी सदस्य होतो. मोफत वीज आणि मुबलक वीज असं २०१४ साली आम्ही महाराष्ट्राच्या जनतेला आश्वासन दिलेलं. मोफत वीज देता आली नाही, मुबलक वीजही देता आली नाही,” असं खडसे म्हणाले.

आम्ही विरोधकांची भूमिका बजावतोय हे दाखवण्यासाठी केलेले हे मोर्चे असतात, असा टोलाही खडसेंनी लागवलाय. मोर्चे काढणं हा विरोधकांचा अधिकार आहे. केंद्र सरकारकडून जी वाढ होतेय त्याबद्दल बोललं जरासं तर बरं वाटेल, असा शाब्दिक चिमटाही त्यांनी काढला.