देशभरासह राज्यात करोना संसर्ग झपाट्याने वाढताना दिसत आहे. दैनंदिन रूग्ण संख्येत मोठी वाढ सुरू आहे. शिवाय, करोनाबाधितांचे मृत्यू देखील होत आहेत. एककीकडे करोनाने पुन्हा डोकं वर काढलेलं असताना, दुसरीकडे करोनाचाच नवा व्हेरिएंट असलेल्या ओमायक्रॉनचा संसर्ग देखील वाढत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र तसेच सर्वच राज्य सरकारकडून सर्वोतोपरी दक्षता घेतली जात आहे, शिवाय लसीकरण वाढवण्यावर जोर दिला जात आहे. याच पार्श्वभूमीवर काल राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी महाराष्ट्रात कोवॅक्सिन लसीचा तुटवडा असल्याचे सांगितले आहे. शिवाय, आम्ही केंद्राकडे लशींसाठी मागणी केलेली असल्याचंही ते म्हणाले होते. यावरून भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. “किमान महिनाभर पुरेल इतका लससाठा असूनही महाराष्ट्राला अजून लस हवी आणि ती मिळत नाही, असा कांगावा महाविकास आघाडीने सुरू केलाय. PIB ने याबाबत सत्य स्पष्ट करणारी माहिती दिली त्यानुसार महाराष्ट्राकडे कोव्हिशिल्ड लसीच्या सुमारे सव्वा कोटी व कोव्हॅक्सिनच्या ३० लाखांहून अधिक मात्रा आहेत.” असं चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत. तसेच, “१५ -१८ आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी तिसरा डोस यासाठी कोव्हॅक्सिन २.९४ लाख तर कोव्हिशील्ड रोज ३.५७ लाखाचे आकडे कोविन डॅशबोर्डवरही दिसताहेत. म्हणजेच महिनाभर पुरेल इतका लससाठा महाराष्ट्राकडे असल्याचं स्पष्ट आहे. आजही (१४ जाने) महाराष्ट्राला ६.३५ लाख कोव्हॅक्सिन देण्यात आल्यात.” अशी माहिती देखील चंद्रकांत पाटील यांनी ट्विटद्वारे दिली आहे. याचबरोबर, “महिनाभर पुरेल इतका लससाठा असूनही आणखी लस मागणं आणि ती मिळत नाही म्हणून गळे काढण्यातून साध्य काय होईल? असं राजकारण करून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातील केंद्र सरकारची बदनामी होतेय की, स्वतःचं हसं हे महाविकास आघाडीने एकदा तपासून घ्यावं.” असं म्हणत चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे. शिवाय त्यांनी आपल्या ट्विटबरोबर पीआयबीची बातमी देखील जोडली आहे. राज्यात लसींचा तुटवडा, आरोग्यमंत्री राजेश टोपेंची माहिती; केंद्राकडे डोस पुरवण्याची मागणी तर, “महाराष्ट्रात कोवॅक्सिन लसीचा तुटवडा आहे. याबाबत आम्हाला अनेक जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांचे फोन येत आहेत. केंद्रीय आरोग्यमंत्र्यांसोबत व्हिडीओ कॉन्फरन्सवर झालेल्या बैठकीमध्ये आम्ही राज्यातील लसीकरण वाढवण्यासाठी कोविशील्डच्या ५० लाख डोस आणि कोव्हॅक्सिनच्या ४० लाख डोसची मागणी केली आहे.” असं राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं होतं. काय आहे PIB ने दिलेली माहिती - ‘ कोविड-19 अफवा आणि वस्तुस्थिती’ या मथळ्या खाली दिलेल्या बातमीमध्ये सांगण्यात आले आहे की, महाराष्ट्रात लसींचा तुटवडा असल्याचे प्रसारमाध्यमांचे वृत्त वस्तुस्थितीला धरून नाही, राज्यात उपलब्ध असलेल्या लसींच्या साठ्याचे वास्तविक चित्र सादर करणारे नाही. महाराष्ट्रात कोवॅक्सिन या लसीच्या वापर न झालेल्या २४ लाखांपेक्षा जास्त मात्रा शिल्लक आहेत, त्याशिवाय आज ६.३५ लाख अतिरिक्त मात्रा प्राप्त झाल्या आहेत.महाराष्ट्रात लसींचा तुटवडा असल्याचे सांगणारे वृत्त काही प्रसारमाध्यमांमधून प्रसिद्ध करण्यात आले आहे. त्याचबरोबर लसींच्या तुटवड्यामुळे राज्याला लसीकरणाची गती वाढवणे शक्य होत नसल्याचे देखील या वृत्तात म्हटले आहे. अशा प्रकारचे वृत्त पूर्णपणे चुकीचे आणि अपुऱ्या माहितीवर आधारित आहे. याबाबत असे स्पष्ट करण्यात येत आहे की आज उपलब्ध झालेल्या अहवालानुसार(१४ जानेवारी २०२२) महाराष्ट्राकडे कोवॅक्सिन या लसीच्या न वापरलेल्या २४ लाखांपेक्षा जास्त मात्रा आहेत. त्याबरोबरच आज लसीच्या ६.३५ लाख अतिरिक्त मात्रा प्राप्त झाल्या आहेत. कोविनवर उपलब्ध असलेल्या त्यांच्या साप्ताहिक वापराच्या आकडेवारीनुसार, १५ ते १७ वयोगटातील लाभार्थींना देण्यासाठी आणि खबरदारीची मात्रा देण्यासाठी महाराष्ट्राचा दैनंदिन सरासरी वापर २.९४ लाख मात्रा आहे. त्यामुळे राज्याकडे पात्र लाभार्थींना कोवॅक्सिन या लसीच्या मात्रा देण्यासाठी पुढील दहा दिवस पुरेल इतका साठा उपलब्ध आहे. त्याशिवाय राज्याकडे कोविशील्ड या लसीच्या वापर न झालेल्या आणि शिल्लक असलेल्या सुमारे १.२४ कोटी मात्रा आहेत. त्यांचा दिवसाला सरासरी ३.५७ लाख मात्रांचा वापर विचारात घेतला तर हा साठा लाभार्थींना लसी देण्यासाठी ३० दिवसांपेक्षाही जास्त दिवस पुरेसा ठरू शकतो. त्यामुळेच प्रसारमाध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेले वृत्त वस्तुस्थितीला धरून नाही आणि महाराष्ट्रात शिल्लक असलेल्या साठ्याचे आणि वापर न झालेल्या कोविड लसींच्या मात्रांचे वास्तविक चित्र प्रदर्शित करत नाही.