राहाता: आज, बुधवारी मकर संक्रांतीच्या उत्सवाचा आनंद सुरू असतानाच पतंग उडवताना विजेच्या उच्च दाबाच्या तारेचा स्पर्श झाल्याने १४ वर्षीय मुलाचा जागीच मृत्यू झाला, तर त्याचा १९ वर्षीय मित्र या घटनेत जखमी झाला आहे. ही घटना दुपारच्या सुमारास कोपरगाव शहरातील लक्ष्मीनगर परिसरात घडली आहे.
अर्णव महेश व्यवहारे (वय १४) असे मृत मुलाचे नाव आहे. ऋषिकेश संजय वाघमारे (वय १९, रा. कोपरगाव) असे जखमीचे नाव आहे. मृत अर्णव हा मूळचा पिंपरी-चिंचवड येथील काळेवाडी फाटा परिसरातील रहिवासी असुन तो मकर संक्रांतीचा सण साजरा करण्यासाठी काल, मंगळवारी सायंकाळी कोपरगाव येथील लक्ष्मीनगर भागात राहाणारे त्याचे मामा ओंकार काळे यांच्या घरी आला होता. सणाच्या दिवशी सकाळी अर्णव आपल्या मित्रांसोबत घराच्या गच्चीवर पतंग उडवण्याचा आनंद घेत होता. मात्र, या आनंदाचे रूपांतर काही क्षणातच शोकांतिकेत झाले.
मिळालेल्या माहितीनुसार, अर्णव आणि त्याचा मित्र ऋषिकेश संजय वाघमारे हे गच्चीवर पतंग उडवत होते. पतंग उडवण्यासाठी त्यांनी वायडिंगचा (धातूच्या तारेचा) वापर केला होता. पतंग आकाशात झेप घेत असताना, या तारेचा अचानक जवळून जाणाऱ्या विजेच्या उच्च दाबाच्या तारेला स्पर्श झाला. या तारेतून प्रचंड दाबाचा विद्युत प्रवाह अर्णवच्या शरीरात उतरल्याने त्याला भीषण झटका लागला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. अर्णव सोबत असलेला त्याचा मित्र ऋषिकेश वाघमारे यालाही विजेचा धक्का बसला असून तो जखमी झाला आहे. त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती स्थिर आहे.
सुट्टीच्या आनंदासाठी मामाकडे आलेल्या लाडक्या भाच्याचा असा दुर्दैवी अंत झाल्याने व्यवहारे आणि मामाच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेची माहिती मिळताच परिसरात मोठी गर्दी झाली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. मकर संक्रांतीच्या काळात पतंग उडवताना अनेकदा नायलॉन मांजा किंवा धातूच्या तारांचा वापर केला जातो, जो अत्यंत धोकादायक ठरू शकतो. ही घटना समोर आल्यानंतर प्रशासनाच्या वतीने नागरिकांना विशेषतः पालकांना आवाहन करण्यात आले आहे की, मुलांनी पतंग उडवताना विजेच्या तारांपासून लांब राहावे आणि सुरक्षेचे सर्व नियम पाळावेत. अनावधानाने झालेली एक चूक जीवावर बेतू शकते, त्यामुळे खबरदारी घेणे आवश्यक असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. याबाबत कोपरगाव शहर पोलिसांनी अकस्मात मृत्यूचा गुन्हा दाखल केला आहे.
