सांगली : रत्नागिरी जिल्ह्यातील हातखंबाहून पुण्याला नेपाळी कामगारांना घेउन निघालेल्या प्रवासी बसला कराड- शेडगेवाडी रस्त्यावरील मांगिरी खिंडीत आग लागण्याचा प्रकार गुरूवारी पहाटे घडला. या दुर्घटनेत कोणालाही इजा झाली नसली तरी लाखो रूपयांचे साहित्य जळून खाक झाले.
गुरुवारी पहाटे तीनच्या सुमारास आरामबस शिराळा तालुक्यातील कराड -शेडगेवाडी राज्य मार्गवरील मांगिरी खिंडित आली असता बसला चढण चढत नसल्याने गाडी मधील निम्मे प्रवाशी खाली उतरल्या नंतर शंभर मिटर पुढे घाट चढून गेल्यानंतर बसने अचानक पेट घेतला. यामुळे बसमध्ये असलेले अन्य प्रवासी खाली उतरून आरडा ओरड करु लागले. बसला अचानक आग लागल्याने चालकही बस थांबवून खाली उतरला. पहाता पहाता बसला आगीने वेढले. या आगीत बस जळून खाक झाली.
आगीमध्ये बससोबत प्रवाशांचे साहित्यही जळून खाक झाले. काही कामगारांनी गावी जात असताना रोख रक्कमही सोबत घेतली होती. कपडे, आंबे व अन्य साहित्यही या आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. यात लाखो रूपयांचे नुकसान झाले. अज्ञात व्यक्तिने या आगीची माहिती कराड अग्निशमक दलास कळविल्यानंतर पहाटे सव्वा पाच वाजता आग विझवण्यात आली.




रत्नागिरी जिल्ह्यात विविध ठिकाणी नेपाळमधून रोजंदारीसाठी आलेले कामगार खासगी आरामबसने (एमपी ४९ एमएम २७२७) कोकरूडमार्गे पुण्याला निघाले होते. यामध्ये चायनीज खाद्यपदार्थ करणारे, शेतीत काम करणारे कामगार बागायत कामगार, हॉटेल, गुरखा, कपडे विक्री, तबेला कामगार, वेटर, स्वयपाक़ी यासह विविध कामासाठी आलेले ५९ नेपाळी महिला पुरुष हातखंबा (जि. रत्नागिरी) पुण्याच्या दिशेने निघाले होते.