चैत्र एकादशी निमित्त रविवारी पंढरपूरात शासकीय महापूजा पार पडली. जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांनी श्री विठ्ठल रुक्मिणी ची सपत्नीक पूजा केली. तर दर्शन रांगेतील कोल्हापूर जिल्हा करवीर तालुका नांदगाव येथील तायप्पा सुबराब कांबळे व सौ आक्काताई तायप्पा कांबळे या दांपत्याला मानाचा वारकरी म्हणून पूजेचा मान मिळाला. या यात्रेनिमित्ताने १८ पर्यंत व्हीआयपी आणि ऑनलाईन दर्शन पूर्णपणे बंद ठेवण्यात आल्याची माहिती, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी शिवाजी कादबाने यांनी दिली. दरम्यान, या यात्रेसाठी आलेल्या हजारो भाविकांनी आज पंढरी नगरी गजबजून गेली. वारकरी सांप्रदायात आषाढी, कार्तिकी, माघी आणि चत्री यात्रेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. यातील यंदाची चैत्री यात्रा उद्या पार पडत आहे. या यात्रेसाठी हजारो वारकरी शनिवारीच पंढरी नगरीत दाखल झाले आहेत. यात्रा काळात भाविकांच्या सोयीसाठी नातेपुते येथील ३० कमांडोंचे पथक दाखल झाले आहे. दर्शन रांगेत ८ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. देणगी गोळा करणे आणि स्वच्छतेसाठी जवळपास ४०० स्वयंसेवकांची नेमणूक करण्यात आले आहे. नवमी ते द्वादशी पर्यंत दर्शन मंडपात भाविकांना स्वच्छ पिण्याचे थंड पाणी आणि चहा मोफत वाटप केला जाणार आहे. नवमी म्हणजे दि १६ ते द्वादशी म्हणजेच दि १८ एप्रिल पर्यंत व्हीआयपी दर्शन आणि ऑनलाईन दर्शन पूर्णपणे बंद ठेवण्यात आले आहे. यात्रेसाठी आलेल्या भाविकांना श्री विठ्ठल -रुक्मिणीचे दर्शन घेता यावे,या करीता संत नामदेव पायरी येथे सोमवापर्यंत (दि. १८) एक एलईडी स्क्रीन बसविण्यात येणार आहे. या यात्रेसाठी सुमारे एक लाख ५० हजार लाडू व ५० हजार राजगिरा लाडू प्रसाद तयार करण्यात आला आहे. चत्री एकादशीला मंदिर समितीचे सभापती तुकाराम मुंढे यांच्या हस्ते महापूजा होणार आहे.