चंद्रकांत पाटील यांची कबुली; टक्केवारी घेणाऱ्यांना पदे नाहीत

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात रिक्त असलेल्या १३० महामंडळांच्या अध्यक्ष व संचालकांची नियुक्ती करण्याच्या सूचना दिल्या असून त्यासाठी १३०० प्रामाणिक कार्यकत्रे मला दुर्बीण घेऊन शोधावे लागत आहेत. महाराष्ट्रात भाजपचे दीड कोटी सभासद असताना त्यातून चारित्र्यसंपन्न कार्यकत्रे शोधणे अवघड असल्याची खंत व्यक्त करून टक्केवारी घेणाऱ्यांना पद दिले जाणार नसल्याचे स्पष्टीकरणही महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले.

बीड जिल्ह्य़ातील माजलगाव येथे भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेच्या त्रवार्षकि शिबिराचा समारोप २५ डिसेंबर रोजी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत झाला. या वेळी बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, तीन वर्षांपासून राज्यात भाजप महाआघाडीचे सरकार कार्यरत असून आगामी काळात संघटना मजबूत करण्यासाठी व कार्यकर्त्यांना न्याय देण्यासाठी जानेवारीत रिक्त असलेल्या १३० महामंडळांचे अध्यक्ष आणि इतर संचालक नियुक्त करावयाचे आहेत. यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याला प्रामाणिक कार्यकत्रे निवडण्यास सांगितले. राज्यात भाजपचे दीड कोटी सभासद असताना रिक्त असलेल्या पदांवर कार्यकर्त्यांना संधी देण्यासाठी १३०० ते १५०० प्रामाणिक व चारित्र्यसंपन्न माणसे दुर्बीण घेऊन शोधावी लागत आहेत, अशी खंत व्यक्त केली. कोणत्याही महामंडळाच्या पदावर टक्केवारी घेऊन काम करणाऱ्याला संधी दिली जाणार नाही. चारित्र्यसंपन्न कार्यकत्रे मिळतील अथवा नाही, परंतु कार्यकत्रे व मित्रपक्षांना संधी देण्यासाठी लवकरच या नियुक्त्या केल्या जातील, अशी पुष्टीही त्यांनी जोडली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे देशात प्रामाणिकतेला बळ मिळाले. परंतु चारित्र्य संपुष्टात येत आहे, ही गंभीर बाब शिक्षकच दूर करू शकतो. यासाठी शिक्षकांनी कायम चारित्र्य निर्मितीच्या शाळा सुरू ठेवल्या पाहिजेत, असे आवाहन केले. संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुरेंद्र आलुरकर यांनी संस्थेच्या कामाबाबत माहिती दिली.

वर्षभरात लाच घेताना २०० तलाठी पकडले

महसूलमंत्री म्हणून काही दिवसांपूर्वी तलाठय़ांच्या संमेलनात गेल्याची आठवण करून देत चंद्रकांत पाटील म्हणाले, वर्षभरात लाच घेताना २०० तलाठी पकडले, त्यात २० महिला तलाठी होत्या, याचे दु:ख वाटते. महिलांकडून समाजाच्या अशा अपेक्षा नाहीत. माताही चारित्र्यसंपन्न पिढी घडवते, असा इतिहास आहे.