इतर मागासवर्गीयांचे आरक्षण (ओबीसी) रद्द झाल्याने खुल्या झालेल्या राज्यातील ३२ जिल्ह्यांमधील १०६ नगरपंचायती आणि दोन जिल्हा परिषदांमध्ये ४१३ जागांसाठी मतदान पार पडल्यानंतर निकाल हाती आले आहेत. राज्यातील नगरपालिका तसेच नगरपंचायत तसेच भंडारा व गोंदिया जिल्हा परिषदांच्या निवडणुकांमध्ये भाजपाने सर्वाधिक जागा मिळवल्या असून भाजपाच सर्वात मोठा पक्ष असल्याचे भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे. महाविकास आघाडीचे आकडे दाखवताना त्यांनी आधी एकत्र लढायला पाहिजे होते. तिन्ही पक्ष एकत्र येऊन जर ही निवडणूक लढले असते तर कार्यकर्ते एकमेकांच्या छाताडावर बसले असते. त्यामुळे सर्वसामान्य माणूस याला फसणार नाही. भाजपला चांगलं यश मिळालं, आम्हीच नंबर एकचा पक्ष आहोत, अशी प्रतिक्रिया चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. “विधानसभा, लोकसभा निवडणुकीत तुम्ही एकत्र लढू शकत नाही. त्या निवडणुकांमध्ये तुमची ठोकशाही, हुकूमशाही चालणार नाही. राष्ट्रवादी हा सगळ्यात हुशार पक्ष आहे. राष्ट्रवादी मुख्यमंत्री पद दुसऱ्याला देते पण महत्वाची खाती स्वतःकडे ठेवते. पक्ष वाढवण्यासाठी खूप पैसे घातले जातात. मुख्यमंत्री पद शिवसेनेला देऊन धडाधड फाईली सही करण्यासाठी आणल्या. मोठ्या प्रमाणात कामे करुन घेतली आहेत. हे शिवसेनेच्या खासदार आमदारांनाही कळायला लागले आहे,” असे चंद्रकांत पाटील म्हणाले. “निवडणुकांमध्ये भाजपाला चांगलं यश मिळालं, आम्हीच नंबर एकचा पक्ष आहोत. निवडणूक लढवताना हे तीनही पक्ष वेगवेगळे लढतात आणि निकाल आल्यावर एकत्र येतात. आम्ही जो आमच्या जागा असा दावा केलाय तो आमच्या चिन्हावर जे निवडून आलेत त्यांचा तर आहेच मात्र ज्यांना आम्ही पाठिंबा दिलाय त्यांचाही त्यात समावेश आहे. या आकड्यांनी विधानसभा लोकसभेच चित्र बदलणार नाही. लोकसभा निवडणुकीत भाजपची ताकद दिसेल. त्यावेळी योजना आणि मोदींचा चेहरा सर्वकाही ठरेल,” असेही चंद्रकांत पाटील म्हणाले. दरम्यान, भाजपाला २४ नगरपंचायती आणि ४१६ जागा मिळाल्या असून राष्ट्रवादी काँग्रेसला २५ नगरपंचायती आणि ३८७ जागा मिळाल्या आहेत. तर काँग्रेसला १८ नगरपंचायची आणि २९७ जागा तसंच शिवसेनेला १४ नगरपंचायती आणि ३०० जागा मिळाल्या आहेत. म्हणजे महाविकास आघाडीला एकूण ५७ नगरंपतायची आणि ९७६ जागा तर भाजपाला २४ नगरपंचायती ४१६ जागा मिळाल्या आहेत.