निसर्ग चक्रीवादळाचा फटका बसल्याने कोकणातील सुमारे दीड हजार गावांमध्ये वीज पुरवठा खंडित झाला आहे. त्यामुळे लोकांनी सौर दिवे वापरण्यास सुरुवात केली आहे. स्थानिक लोकांची ही गरज ओळखून भाजपाचे प्रदेशाध्यक्ष, आमदार चंद्रकांत पाटील यांनी सहा हजार सौर दिवे कोकणात पाठवले आहेत. त्याचे वाटपही सुरू झाले आहे.
निसर्ग चक्रीवादळाचा जोरदार फटका कोकण किनारपट्टीला बसला. त्यामध्ये महावितरणचे मोठे नुकसान झाले. विजेचे अनेक खांब उन्मळून पडले. महावितरणने यंत्रणा कार्यान्वित केली असली वीज पुरवठा खंडित झाला असून, तो पूर्ववत होण्यास आणखी काही कालावधी जाणार आहे. सध्या लोकांना विजेविना रहावे लागत आहे.
याला पर्याय म्हणून लोकांनी सौरदिवे वापरण्यास सुरुवात केली आहे. रायगड, रत्नागिरी जिल्ह्यातून सौर दिवे मागणी वाढली आहे. मुंबई-पुणे भागातून याची खरेदी होऊ लागली आहे. याकडे लोकसत्ताने लक्ष वेधले होते. स्थानिक लोकांची ही अडचण लक्षात घेऊन आमदार चंद्रकांत पाटील यांनी मदतीचा हात पुढे केला आहे. बऱ्याच गावांमध्ये विजेचा तुटवडा असल्याने त्यांनी ६ हजार सौर दिवे कोकणात पाठवले आहेत. चंद्रकांत पाटील यांनी कोकणला प्रकाशमान करण्याचा प्रयत्न चालवला आहे. अनेक गावात याचे वितरण सुरू आहे, असे आमदार प्रशांत ठाकूर यांनी रविवारी ‘लोकसत्ता’ला सांगितले.
